रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

मराठी भाषा गौरव दिन समारंभ २०२४



     मराठी भाषा गौरव दिन समारंभ २०२४
जाणीव सामाजिक सेवा संस्था नवीन पनवेल व ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय नवीन पनवेल या  सामाजिक भान जपणाऱ्या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ,   (सी. के. टी विद्यालय शेजारील गार्डन ) येथे सकाळी ११ ते १२:३० या वेळेत मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य लक्षात घेऊन पुस्तक आदान - प्रदान व बौद्धिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या समारंभासाठी प्रमुख वक्ते माननीय श्री रोहिदास पोटे साहेब ( माजी शिक्षण सहसंचालक पुणे , श्रेष्ठ कवी , प्रभावी वक्ते , सिद्ध हस्त लेखक , कोंकण मराठी साहित्य परिषद  पनवेल शाखेचे अध्यक्ष) ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे  सचिव श्री जनार्दन पुगावकर  ,जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर अशी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. 
या समारंभाचे प्रास्ताविक करताना जाणीव चे विश्वस्त प्रा.श्री संजय पाटील यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर श्री विजय गोरेगावकर यांनी मराठी भाषादिन गौरवाचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद  केले. या समारंभाचे प्रमुख वक्ते श्री रोहिदास पोटे साहेबांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कवींच्या लेखणीतून मराठी भाषा जतन आणि संवर्धनाचे मोलाचे कार्य झाल्याचे नमूद करताना विष्णू सखाराम खांडेकर , कुसुमाग्रज , विंदा करंदीकर , भालचंद्र नेमाडे या चारही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक कवीच्या साहित्याचा परिचय करून दिला. 
कुसुमाग्रजांच्या कवितांनी मराठी मनांना उभारीने जगण्याची दिशा दिली , माणसांना माणसात आणण्यासाठी शब्दाचे  फटकारे मारून शहाणे केले. आज माणसातला माणूस हरवत चालल्याची खंत व्यक्त करतांना पोटे साहेब म्हणाले " आजकाल जाणीव ची उणीव भासते आहे म्हणून जाणीव संस्थेच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले. "वाचन संस्कृती वाढल्याशिवाय मराठी भाषा तग धरणार नाही , मराठी भाषेचे नातं पोटाशी जुळले तर मराठी खऱ्या अर्थाने विकसित होईल , आमच्या नातवाला मराठी वाचता येत नाही पण इंग्रजी छान वाचतो आणि बोलतो असे सांगणारे मराठी माणसे पाहिल्यावर वाईट वाटते, ज्याची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट आपली मराठी माणसे अभिमानाने सांगतात तेव्हा अशी मानसिकता बदलली पाहिजे , एका बाजूला  इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि शिक्षक वाढताहेत नि मराठी शाळा नि शिक्षकांची गळचेपी सुरू आहे . थोडक्यात सांगायचे तर  दारूची दुकाने उघडायला परवानगी द्यायची नि दारूबंदीची घोषणा करायची असे विरोधी चित्र मराठी बाबत सुरू आहे. वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसे आयुष्य घडवतात या मुद्यावर बोलतांना पोटे साहेब म्हणाले - पैसा आणि प्रतिष्ठेच्या हव्यासाने माणूस मनातून व माणसांतून उतरत चालला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या अंत्य समयी आयुष्याचे खरं स्वरूप सांगितलं , निव्वळ पद, पैसा , महत्त्वाचा नसून आयुष्यात खरे सुख आणि समाधान महत्त्वाचं आहे . घर वाचनाचे केंद्र बनले पाहिजे. मुलांना पुस्तक हाताळू द्या. मन मोकळं करा , विचार करा . ज्ञानसाधना करा , आपण साधना करायला कमी पडतो. उमेद बाळगा . दशरथ मानजीने २२ वर्षे बोगदा खोदला .लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, अविश्रांत काम करा , दशरथ मानजी टनेल नाव आणि चित्रपट कायमचा स्मरणात राहील असे वागा. शिक्षक एक जप असतो शिक्षक एक तप असतो.  शिक्षक आचार- विचार असतो शिक्षक लाचार नसतो. शिक्षक एका माणसाचं सैन्य असतो ......... पोटे साहेबांच्या या त्यांच्या कवितेतून उपस्थित श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले. जात ,धर्म पंथ यांच्या विळख्यात सापडलेला माणूस जेव्हा माणूस म्हणून स्वतःची जात सांगेल तेव्हा समाजाचे संतुलन टिकेल यासाठी त्यांनी त्यांची आवडती कविता ' प्रलय ' मधून आपल्या भावना व्यक्त केल्याची आठवण सांगितली. 
आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थित ज्ञानसाधना चे संचालक,वाचक, साहित्यिक व श्री संत रोहिदास विकास मंडळाचे सदस्य , कोंकण मराठी साहित्य परिषद चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित  श्रोत्यांनी आपल्या घरातील त्यांची वाचून झालेली पुस्तके सोबत आणली होती ती सर्व (किमान १००) लहान मोठी पुस्तके आदान - प्रदान करण्यात आलीत.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाणीव चे संचालक श्री महेश मुद्रस यांनी केले तर आभार प्रकटीकरण ज्ञान साधना वाचनालयाचे सचिव श्री पुगावकर व श्री संजय पाटील यांनी करताना कार्यक्रमाची सांगता व सार्थक झाल्याचे समाधान व्यक्त केले.
--------- शब्दांकन : प्रा. संजय पाटील -------

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

प्रभावी वक्ता : डॉ. दिलीप देशमुख

प्रभावी वक्ता  : डॉ दिलीप देशमुख 

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ५१ वें जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २९ ते ३१ जानेवारी २०२४ असे तीन  दिवस सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे आयोजित केले होते. या तिन्ही दिवसात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी लाभली. पहिल्या दिवशी (२९ जानेवारी)  विज्ञान प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी 'परिक्षेपे चर्चा' या लाईव्ह कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना दिलेल्या दिलखुलास उत्तरातून असे लक्षात आले की व्यक्ती निव्वळ पदाने किंवा पैशाने श्रेष्ठ ठरत नाही तर त्याच्या आचार - विचाराने , भावनिक साद आणि संवादाने लोकांच्या मनात आपला ठसा उमटवत  असते. पंतप्रधानांची विद्यार्थ्यां बद्दलची आत्मीयता , तळमळ त्यांच्या सहज बोलण्यातून श्रोत्यांना जाणवत होती. वेळ आणि श्रमाचे महत्व अधोरेखित करतांना ते सांगत होते : आपला दृष्टिकोन व्यापक बनवा , सरावात सातत्य ठेवा , गुरू- आई वडील यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगा , धीट बना .....आपलं भविष्य आपण सहज घडवू शकतो. असे अनेक मुद्दे त्यांनी या चर्चेत ओघावत्या शैलीत मांडलेत. त्यांना प्रश्न विचारणाऱ्या विविध राज्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास , भाषेवरील प्रभुत्व , जिज्ञासा इ. गुणांचे दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा ,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री सत्यजित बढे , माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ जोत्सना शिंदे / पवार , उप शिक्षणाधिकारी सौ.सुनीता पालकर , सुधागड विद्या संकुल कळंबोलीचे प्राचार्य श्री राजेन्द्र पालवे , या  मान्यवरांची भाषणे झालीत. यावेळी सर्व वक्त्यांच्या भाषणातून मानवाच्या विकासात विज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून विज्ञानाला अध्यात्माची जोड असणे तितकेच महत्वाचे आहे असा सूर व्यक्त झाला. त्यातूनही सर्व वक्त्यांचे समृध्द अनुभव विश्व , विचार व्यक्त करण्याची हातोटी , साधेपणाने व्यक्त होणारे शहाणपण जाणवले.
दुसऱ्या दिवशी ( ३० जानेवारी ) दुपारी १२ ते २ यावेळेत  डॉ . दिलीप देशमुख यांचे सुश्राव्य व्याख्यान अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेच होते. डॉ देशमुखांचा परिचय देताना उप शिक्षणाधिकारी सौ सुनीता पालकर मॅडम म्हटल्या " डॉ दिलीप देशमुखांचे कार्य कर्तृत्वाचे अवकाश व्यापक आहे . तरी त्याचा अल्पसा परिचय द्यायचा झालाच तर डॉ देशमुख हे शास्त्रज्ञ , शिक्षण तज्ज्ञ , गणित तज्ज्ञ , विविध शैक्षणिक , वैज्ञानिक , सामाजिक संस्थांचे ते संचालक आहेत. आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने भारतासह अन्य ३२ देशात लोकप्रिय आहेत." उपस्थित बहुसंख्य श्रोत्यांनी डॉ देशमुख याच्या भाषणाची ख्याती अनुभवलेली होती तरी आजच्या भाषणात ते काय सांगतात याबद्दल माझ्यासह अनेकांची जिज्ञासा टिपेला पोहचली होती. 
डॉ . दिलीप देशमुख बोलायला उभे राहिले . आपल्या समृध्द अनुभवाच्या पोतडीतून एक एक प्रेरक प्रसंग सांगत विद्यार्थ्यांसह सर्व श्रोत्यांना भरभरून विचारांचे दान द्यायला त्यांनी सुरुवात केली. दुपारी १२ वाजता सुरू झालेले त्यांचे सुश्राव्य ओघावत्या शैलीतील भाषण  तब्बल २ तास अविरत सुरू होते. या दोन तासात कोणीही श्रोते जागा सोडून उठून गेले नाहीत की आपसात कुजबुज केली नाही.   असं काय होतं त्यांच्या भाषणात ?  तर सर्वार्थाने समृध्द म्हणता येईल असे त्यांचे भाषण झाले.समाजासाठी विज्ञान या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन असल्याने दैनंदिन पण साध्या सोप्या उदाहरणातून विज्ञानाचे महत्व त्यांनी पटवून दिले . आईन्स्टाईन महात्मा गांधीजींचे शिष्य होते हा मुद्दा विषद करतांना 'विद्या विनयने शोभते' हे सुभाषित अधिक स्पष्ट झाले. नेपोलियन ने जग जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवले त्यात एका आयफेल नावाच्या इंजिनियर ने सादर केलेला प्रकल्प बघून नेपोलियन बेहद्द खूष झाले नि  त्यातून आयफेल टॉवर उदयास आले. या मुद्यातूनही जगतजेतेही दर्दी ज्ञानोपासक असावेत हे स्पष्ट केले. नेचर नावाचे मॅगझिन प्रत्येकाने वाचावे कारण त्यात जगातील नवनवीन संशोधनाबद्दल उत्तम माहिती दिली जाते हे सांगताना प्रत्येकाने चतुरस्र असावे हे नमूद केले. आई - वडील व  शिक्षक आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात यावर भाष्य करताना ते म्हणाले की डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम , डॉ.राम ताकवले यांसारखे गुरू मला लाभले म्हणूनच जगण्याची दिशा गवसली. उत्तमोत्तम व्यक्तीचा सहवासाचा फायदा सांगताना : साने गुरुजी , यशवंतराव चव्हाण यांच्या मांडीवर मी बागडलो आहे तर वसंत गोवारीकर , रघुनाथ माशेलकर , जयंत नारळीकर विभूतीन बरोबर कार्यरत राहिलो आहे  हे ही  सांगितले. आपल्या रोजच्या जगण्यातून व बारीकसारीक निरिक्षणातून वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात यावर भाष्य करताना त्यांनी आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाचे उदाहरण दिले. आईन्स्टाईन रोज आपल्या आजीच्या कष्टाचे काम बघत असताना (निरिक्षणातून शोध) त्यांनी सावलीचे , पाण्याचे घड्याळ शोधले , चक्कीचा शोध लावला. एका मुलाने दगडाखलाचे विश्व या विषयावर शोध प्रबंध लिहिला आणि दुर्लक्षित घटकही मोलाचे असतात हे दाखवून दिले. उत्तमोत्तम पुस्तके वाचा याबद्दल बोलताना डॉ देशमुखांनी shifted power याबद्दल बोलताना त्यांनी शक्ती तीन प्रकारच्या असतात  १) मसल पॉवर २) मनी पॉवर ३) नॉलेज पॉवर यातील नॉलेज पॉवर हीच कशी श्रेष्ठ आहे हे पटवून देताना लक्ष्मी आणि सरस्वती या दैवतांचे फोटो बघा , लक्ष्मी उभी आहे तर सरस्वती बसलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे पैशाचे प्रतीक लक्ष्मी चंचल आहे तर बुध्दीचे प्रतीक सरस्वती अचल आहे हे अधोरेखित केले. नेमके प्रतीकात्मक प्रतिपादन कसे असावे हे  या मुद्यातून स्पष्ट झाले .यश मिळवायचे असेल तर प्रचंड मेहनत आणि प्रसंग अवधान महत्त्वाचे असते हे सांगताना धीरूभाई अंबानी यांचे उदाहरण दिले. धीरूभाई यांना विचारले की ८० हजार करोड ची संपत्ती कशी मिळवली तर धीरूभाई म्हटले मी मिनिटाला ६०० शब्द वाचतो , दुसऱ्या एका प्रसंगाबद्दल सांगितले की राजीव गांधी पंतप्रधान असताना मुंबईत येणार होते तेव्हा धिरुभाईंनी राजीव गांधींना भेटण्यासाठी अर्धा तास वेळ मागितली ती  नाकारली गेली : (अशा मोठ्या लोकांना भेटायच्या आधी काही मधले लोकं आडवे येणारे असतात त्यांचाच मोठा प्रश्न आपल्याकडे सर्वत्र आहे.) शेवटी पाच मिनिटांची वेळ मिळाली व भिरुभाई राजीव गांधींना भेटले , औपचारिकता म्हणून पुष्पगुच्छ दिला नि बाहेर आले. अनेक पत्रकारांनी धीरूभाई यांना विचारले की राजीव गांधी यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली ? धिरूभाई पत्रकारांना काही न बोलता निघून गेले . कारण  गुजरात मध्ये झालेल्या वादळात रिलायन्स कंपनीचे प्रचंड नुकसान झाले होते व रिलायन्स चे शेअर्स पडले होते . या भेटीचा परिणाम असा झाला की रिलायन्स चे शेअर्स पुन्हा गगनाला भिडले. प्रसंग अवधान आणि मेहनत असेल तर यश खेचून आणता येते / मिळतेच . असे कितीतरी प्रसंग , अनुभव सांगत विज्ञान आणि समाज यांची जोपासना आपल्या दैनंदिन निरिक्षणातून , परिश्रमातून , कल्पकतेतून सहज करता येते यावर अतिशय मनमोकळे पणाने भाष्य केले.
थोडक्यात चतुरस्र वक्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ देशमुख असे भावोद्गार उपस्थित सर्व श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणें व्यक्त होत होते.त्यांचं ते भाषण माझ्यासह अनेकांना प्रेरणादायी होते म्हणूनच ती आठवण जपून ठेवता यावी व इतरांना ही सांगावी म्हणून येथे नोंदवून ठेवत आहे .

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दादांना साष्टांग दंडवत !

                     दादांना साष्टांग दंडवत !

दादासाहेब , तुम्ही अथक प्रयत्नाने सुरू केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळा , महाविद्यालये उतुंग यशाच्या वाटेवर धावताहेत . त्यासाठी आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी - माजी संचालकांचे, निस्वार्थी  मुख्याध्यापक , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान तर आहेच परंतु त्याहीपेक्षा अधिक तुमचे आशीर्वाद आणि शिकवण आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरते आहे. दादासाहेब , तुम्ही नेहमी म्हणायचे - ' कृती पाहिजे , बडबड नको ' ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ' ' भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली आणि या भूमीला पावन केले ' ' रंजल्या गांजल्यांची सेवा करा - देव भेटेल ' या , शिका , मोठे व्हा ! ' ' आचाराने आणि विचाराने दरिद्री बनू नका ' अशी कितीतरी सुभाषित सदृश्य वाक्य तुमच्या भाषणांतून आम्ही ऐकली आहेत ; तुमचे विचार काहींनी स्मरणात ठेवलेत  पण काही कृतघ्न लोकं तुमची शिकवण विसरून पदाचा  माज दाखवण्यात मश्गूल झालीआहेत . 

    दादा, आज तुमच्या जयंती निमित्ताने तुमच्या प्रतिमांना हार तुरे घालून तुम्हाला अनेकजन प्रामाणिकपणे वंदन करतील .तर काही जन सवयी प्रमाणे पाल्हाडिक लंबी -चौडी भाषणे करतील. त्यात त्यांचे नाटकीपण जास्त असेल. स्वतःला सर्वज्ञ समजणारे ,  बेगडी वागणारे काही हरमाखोर लोकं तुमची शिकवण विसरून मुजोर वागायला लागली आहेत. पदाचा  गैरवापर करत काही नालयकांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून मुजोर मस्ती केली आहे ; काही अजून तसे करत आहेत. त्यातील अनेकांना नियतीने जबरदस्त फटकारे मारले आहेत. तरीही त्यांच्या कुरापती करणे  सुरूच आहे. अशा सडक्या विचारसरणी असलेल्यांना सद्बुद्धी द्या हो दादा !   

   पदाचा दर्प घेऊन फिरणारी काही स्वार्थी व लबाड माणसं आपल्या संस्थेत घाणेरडे राजकारण करत लोकांना सतवत आहेत .   दादा, तुम्ही अशा लोकांबद्दल नेहमी म्हणायचे - ' तळे राखील तो पाणी चाखील ' त्याप्रमाणे काहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी तळे खाली करायचा घाट घातला होता पण नियतीने त्यांचाच घात केला आहे.  तसा दुर्दैवी घात होण्याआधी स्वार्थासाठी व आपल्या मर्जीतील चमच्यांना पुढे आणण्यासाठी  पदाचा गैरवापर करणाऱ्या ढोंगी व संधीसाधू  लोकांनी सावध व्हावे , हीच दादांना खरी श्रद्धांजली - आदरांजली ठरेल. 

     दादासाहेब , तुमचा सहवास आणि आशीर्वाद ज्यांना ज्यांना लाभला ते भाग्यशाली ठरले आहेत . त्यातलाच एक मी आहे . माझ्या पनवेलच्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेला ( सन २००० ) आपण पनवेलला बांठीया विद्यालयात आला होतात त्यावेळी मी आपणास घरी येण्याची विनंती केली होती नि तुम्ही तात्काळ मान्य करून माझ्या घरी आलेत. त्यावेळी माझे आई वडीलही आले होते ; तो माझा आनंद तुम्ही द्विगुणित केला .  एक ऋषितुल्य पितामह घरी येऊन गेल्याचे अलौकिक सुख- समाधान मी कायम अनुभवतो आहे . एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याचा गर्व किंवा ताठा न बाळगता एका सामान्य शिक्षकाच्या घरी आपण आलात म्हणूनच माझे घर पावन झाले.  दादा, तुमचा साधा सरळ स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , दिलदार मन , संस्थेतील सामान्य कर्मचारी बद्दल आस्था नि आपुलकी इ. गुणांमुळे तुम्ही माझ्यासह अनेकांचे श्रद्धास्थान आहात. पूजनीय आहात. 

 दादासाहेब , रोज शाळेत आल्यावर तुमचे दर्शन घडते . तो तुमचा अर्धाकृती पुतळा बघून नेहमी वाटतं की तुम्ही माझ्यासह अनेकांच्या पूर्ण आयुष्याचे पाठबळ आहात.  तुमचा भरभक्कम , अढळ आशीर्वाद आम्हाला लाभला त्याप्रमाणे सुधागड परिवारात नवीन नियुक्त होणाऱ्या सर्वांना लाभो या अपेक्षेेसह आज आपल्या जयंती निमित्त आपणास साष्टांग दंडवत करतो नि थांबतो . 

               तुमचा एक निस्वार्थी सेवक - 

               संजय माधवराव पाटील , पनवेल.

----------------------------------------------------------

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

आमचे शिवरामे अप्पा !

 


शिवरामे सर , अर्थात आमचे अप्पा - काय बोलू तुमच्याबद्दल ? पद आणि प्रतिष्ठेपेक्षा व्यक्ती म्हणून आवडलेला माणूस म्हणजे शिवरामे अप्पा ! खुर्चीच्या गर्व आणि अहंकाराने बरीच माणसे बेताल वागतात किंवा बोलतात पण शिवरामे अप्पा  तरी असे वागले - बोललेले मला स्मरणात नाहीत . मी आजपर्यंत अनेक वरिष्ठांच्या हाताखाली काम केले आहे ते सर्व चांगलेच वागलेत व बोललेत ( काही अपवाद वगळता ) ; पण शिवरामे अप्पाच्या वागण्यात आणि बोलण्यात स्नेह आणि आपुलकी जास्त दिसली. माणसं ओळखायची असतील तर निव्वळ भावनेवर न जाता त्यांच्या व्यवहार चातुर्यावर माणसं ओळखा असे ते नेहमी सांगत आलेत. कोणी आपला सहकारी आपली बदनामी करत असेल तर दुर्लक्ष करत जा , जळत्या घरावर रॉकेल शिंपडणारी माणसे जागोजागी असतात अशांना पाणी पाजायचं धोरण ठेवा.......असे कितीतरी मार्गदर्शक तत्वे त्यांनी मला शिकवलीत. म्हणूच मला रागावर नियंत्रण ठेवायला सोपे गेले :  नोकरीच्या ठिकाणी काम करतांना आपले सहकारी आपल्याला समजून घेणारे, आपली समजूत घालणारे असले की आपोआप नातं घट्ट विणल जातं तसं माझं आणि शिवरामे अप्पाचे नाते विणले गेले. केवळ आपले वरिष्ठ आहेत , त्यांच्याकडून आपल्याला काही खास सवलत मिळेल या अपेक्षेने मी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं तोंडदेखले कौतुक किंवा वाहवा केली नाही आणि करणार पण नाही पण शिवरामे अप्पाबद्दल जे मी आज लिहितोय ते सर्वस्वी माझे अंतर्मनातील बोल आहेत. निव्वळ एक नोकर म्हणून समोरच्याला कोणी  वागवलं तर तो ही निव्वळ चाकर म्हणून काम करतो : त्यात आस्था असत नाही ; अध्यापनाचे किंवा शाळेतील कोणतेही काम  करतांना वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळेजन धावपळ करतो अशावेळी कोणी जर आपल्या कामात उणिवा काढून वरिष्ठांचे कान भरत असेल तर त्याचाही राग अनावर होतो पण अशावेळी संयम कसा ठेवावा हेही शिवरामे अप्पांच्या मार्गदर्शनातून मी शिकलो. कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा असे असे कोणी वागू नये असे शिवरामे सर नेहमी सांगत आलेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रेरणेने समर्पण भावना अनेकांनी घेत आपल्या शाळेसाठी वेळ आणि श्रम वेचले आहेत. आपल्या कर्तव्याबद्दलची आस्था शिवरामे सरांमुळे मला बाळगता आली. जशास तसे उत्तर देणे हा माझा मूळ स्वभाव असला तरी कशालाही का भिडयाचे ही सूचना ते मला कायम देत होते. 

  नियत वयोमानानुसार श्री शिवरामे सर सेवानिवृत्त होत आहेत - आज दि 21 डिसेंबर 2020 रोजी त्यांचा सेवापूर्ती समारंभ के .आ. बांठिया माध्यमिक व एन.एन. पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल येथील सभागृहात आयोजित केला आहे . या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मी निघालो होतो पण प्रवासाचे साधन उपलब्ध न झाल्याने रात्री 10 वाजता पारोळा येथून मला परत यावे लागले याची मला खंत आहे . श्री शिवरामे सरांनी माझ्या नोकरीच्या गेल्या २४ वर्षात मला जो स्नेह दिला , सहकार्य केले व अफलातून मैत्रीचे नाते जपले त्याचा अभिमान मी कायम लक्षात ठेवेल ! श्री शिवरामे सरांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे - समाधानाचे - निरोगी - दीर्घायुषी जावो या सदिच्छेसह मी माझ्या भावनांना विराम देतो ! धन्यवाद ! ---------- संजय पाटील -----------

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

आदर्श गुरुः श्रीमती निंबाळकर म्यडम

सुलभा विजयसिंह निंबाळकर - एक भारदस्त नाव!  
या नावाशी सख्य जमलं ते १९९६ ला ज्यनियर कालेज विभागात आल्यापासून. माणूस अनेक गुणांची मूर्ती असू शकतो याची प्रचिती म्यडमच्या वागण्या- बोलण्यातून मला  नेहमीच आली.
आपुलकीची आणि स्नेहाची दाट सावली , विनम्रतेचा  व निरपेक्ष सहकार्याचा गारवा,  माया - ममतेचा शीतल शिडकावा , बोलण्यातला मधूर गोडवा , स्वत्व व स्वाभिमान जपतानाचा सहज साधेपणा , राहणीमानातली शालीनता  व आभाळासारखं दिलदार मन अशा अनेकविध आदर्श पैलूंनी सम्रुध्द व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती निंबाळकर म्यडम !  
आतापर्यंतच्या माझ्या मराठी विषय अध्यापनातल्या अडचणी मी म्यडमकडे प्रमाणिकपणे मांडल्या व प्रत्येक वेळेस अगदीच सहजतेने त्यांनी मला मार्गदर्शन केले. बांठीया विद्यालयातील माझ्या पहिल्या गुरु म्हणून मी त्यांना मनोमन पूजत आलो आहे , त्यांच्या सोबत शाळेतले बरेच उपक्रम हाताळण्याचं सदभाग्य मला लाभले,  यातूनच मी बरचं काही शिकलो . नियोजनातले बारकावे कसे पाहावेत,  प्रत्यक्ष काम हाताळतांना अविश्रांत मेहनत कशी करावी, सहकारी शिक्षकांवर अढळ विश्वास कसा ठेवावा, विद्यार्थ्यांना आपलसं कसं करावं , हाती घेतलेला उपक्रमाला संयत मूर्तरुप  कसं द्यावं अशा बहुसंख्य गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो .
शाळेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'रौप्यरंग' विशेषांकाचे संपादक मंडळात मी  निंबाळकर म्यडमच्या हाताखाली काम केलं , शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित होणारे हस्तलिखित साकारताना किंवा विविध स्पर्धा अथवा उपक्रमातून म्यडमच्या मार्गदर्शनात मी जे काही काम केलं असेल त्याचं श्रेय म्यडमला जातं.
आज दि ३० सप्टेंबर २०१४ (मंगळवार)  रोजी श्रीमती निंबाकळकर म्यडम नियत वयोमानानुसार सेवानिव्रुत्त झाल्यात , त्यांच्या भावी आयुष्यात सुख - सम्रुध्दी व असेच घवघवीत यश लाभो या सदिच्छेसह थांबतो .

रविवार, १ जून, २०१४

मेहनती -रोडगे सर !

संग्राम शिवाजी रोडगे हे १९८२ पासून बांठिया विद्यालय पनवेल येथे कार्यरत आहेत .३१ मे २०१४ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिव्रत्त होत आहेत , पण ३१ मे ला  उन्हाळी सुट्टी असल्याने दि. २९ एप्रिलला शाळेकडून त्यांना निरोप दिला गेला व ३० एप्रिल  ला सायंकाळी ६ ते १० या वेळेत विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी रोडगे सरांवरील  प्रेमापोटी दिमाखदार सेवापूर्ती समारंभ आयोजित केला होता.  या समारंभासाठी पनवेलचे विद्यमान आमदार श्री प्रशांत ठाकूर ,पनचवेलचे  माजी नगराध्यक्ष श्री संदिप पाटील, जि.प.सदस्य श्री राजेंद्र पाटील,  विद्यालयाचे भूतपूर्व मुख्याध्यापक श्री सुतार सर,  विद्यमान मुख्याध्यापक श्री पवार सर,  पनवेलचे मीडिया प्रतिनिधी,  अनेक शाळांचे मुख्याध्यापक,  शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री रोडगे सरांबद्दल गौरोद्गार  काढलेत.  सर्व वक्त्त्यांच्या भाषणांतून रोडगे सरांच्या ३२ वर्षाच्या सेवेतील आठवणी सांगताना एक मुद्दा समान दिसला व तो म्हणजे रोडगे सरांची शिस्त ,कामावरील निष्ठा.  मी १९९६ पासून रोडगे सरांना पाहतो आहे . शाळेच्या प्रत्येक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोडगे सरांच्या वक्तशीरपणाबद्दल व अविश्रांत परिश्रमाबद्दल कबुली दिलेली आहे . त्यांच्या मित्रांनी त्यांचं कौतुक करणं स्वाभाविक आहे पण त्यांचे विरोधकही त्यांच्या वरील गुणांचं कौतुक करतांना मी अनुभवले आहे . अशी माणसं  समाजासाठी आदर्श ठरतात .रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्ष विनाअनुदानित रात्र शाळा चालवतांना अनेक अडचणी आल्या असतील,  अनेकांशी त्यांचे मतभेदही झाले असतील तरी ते कधीही कोणावरही खूप भडकले किंवा अद्वातद्वा बोलले असं कधीही दिसलं नाही.  पराकोटीचा संयम काय असतो तो त्यांच्या वागण्या- बोलण्यातून जाणवला. एस.एन.डी.टी चे दूरस्थ अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.  केंद्राला मान्यता मिळवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता,  तत्कालीन मुख्याध्यापक श्री मोकल सरांनी,  जोशी सरांनी संस्थेकडे हा प्रस्ताव पाठवला होता पण संस्थेने विहित वेळेत प्रस्तावावर निर्णय न घेतल्याने मी  रोडगे सरांना त्याबाबत सांगितले. व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,  नाशिक ला प्रस्ताव पाठवण्याबाबत बोललो. रोडगे सरांचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेबांचे संबंध खूप सलोख्याचे असल्याने रोडगे सरांना अडचणी आल्या नाहीत व मुक्त विद्यापीठाचे केंद्र बांठिया विद्यालयात सुरु झाले . या ही प्रसंगातून एक लक्षात आलं की रोडगे सर अखंड पाठपुरावा करणारे आहेत . संस्था,  सर्व मुख्याध्यापक यांच्याबरोबर  मैत्रीपूर्ण संबंध असल्याने बहुसंख्य कामे होतात याचाही प्रत्यय आला .हे केंद्र चालवतांना दिवसरात्र मेहनत घेऊन रोडगे सरांनी केंद्राचा पर्यायाने संस्था व शाळेचा लौकिक वाढवला आहे . अनेक अल्पशिक्षितांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण या केंद्रामुळे घेता आले आहे , ही परंपरा कायम टिकावी व रोडगे सरांच्या परिश्रमाचे चीज व्हावे ही अपेक्षा आहे .
निव्रुत्ती नंतर त्यांच्या कामाचा व्याप कमी होवो व सुखी,  समाधानी , आरोग्यदायी दीर्धायुष्य त्यांना लाभो या सदिच्छेसह थांबतो .
.....................................................
संजय पाटील,  पनवेल.

गुरुवार, ८ मे, २०१४

आजोबा

आज संध्याकाळी मनसे च्या दुर्गामाता मंदिराजवळच्या बाकड्यावर मी निवांत बसलो होतो.  ७.३० ची आरती झाली होती.  आरतीत सहभागी असलेल्या महिला आजूबाजूच्या बाकड्यांवर येऊन बसल्या होत्या.  तेवढ्यात एक आजोबा  माझ्याजवळ येऊन मला बोलले , "अहो,  मी बसू का इथे? " मी म्हटले,  " अहो काका,  हे काही विचारणं झालं का?  बसा ना !"  आजोबा बसले.  त्यांनी त्यांच्या बहिणीला फोन लावला व फोनवर रडत - रडत त्यांच्या सूनेची गार्हाणी सुरू केली.  " अगं ताई,  मी दादा बोलतोय,  ......आज मला पेन्शन मिळाले पण तिने सगळं काढून घेतलं माझ्याकडून,  ही लोकं रोज मारतात गं मला,  मी काय करु?  .........अगं,  तू पण मला वेडा म्हणतेस,  जग खरोखर इतकं वाईट आहे का गं?  ........ अगं ताई,  मी मरण मागतोहे पण तेही माझ्या भाग्यात नसावं,  मी नको त्या रस्त्यातून अनवानी फिरतो पण मला साप चावत नाही,  मला  मरावसं वाटतंहे पण ........... " असं संभाषण सुरु असतांना आजोबांना हुंदका अनावर होतो व ते पुन्हा मोठ्याने रडू लागले.  त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी त्यांचं सांत्वन केलं. तेव्हा ते शांत झाले . बोलू लागले,  त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे समजले.  पत्नी वियोगाचे सल त्यांना सतावत होतं,  त्यात सूनेचं वागणं - बोलणं त्यांना सोसवत नसावं,  हे लक्षात आलं. ते उत्तम गायक व कवी असल्याचं त्यांनी मला सांगितलं,  'जग हे बंदीशाला ' हे गीत ते गाऊ लागले.  त्यांचं ते गीत ऐकूण मी भारावलो . ते गीत त्यांच्याच आवाजातलं मी मोबाईलमध्ये रेकार्ड केलं आहे .
त्या आजोबांना खरोखरच सूनेचा जाच असेल तर आजोबांचं विव्हळणं रास्त म्हणावं लागेल.  पण आजोबांना पत्नी वियोगाचे दु:ख अनावर झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असल्यानेही आजोबा असे वागत असतील.  काहीही असो पण आज भेटलेल्या आजोबांनी माझ्या मनाला चटका दिला,  हे खास !   माणसाला सत्ता, संपत्ती नसली तरी चालेल पण संतती चांगली पाहिजे.  मुलाच्या जडण- घडणीसाठी या आजोबांनी आयुष्यभर खस्ता खाल्या असतील पण त्यांच्या वाट्याला आज एकाकी व निराधार असल्यासारखं जगणं आलं आहे . याला जवाबदार कोण असेल,  त्या आजोबांचं पुढे कसं होईल असे असंख्य प्रश्न घेऊन मी घरी आलो . हा अनुभव इतरांना सांगावासा वाटला म्हणून लिहलं.  आपणही आजोबा होणार या विचाराची भीती  इथून पुढे कायम माझ्या मनात असेल. 
...................................................

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

निवडणूक ड्युटी

निवडणूकीच्या कामाचे  आदेश प्राप्त झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंत केंद्राध्यक्षापासून शिपायापर्यंत बुथवरील सर्वच जण टेंन्शनखाली वावरतात.   मी नोकरीला लागल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणूकात केंद्राध्यक्ष म्हणूनच काम केलेले आहे . ती परंपरा कायम टिकवण्यासाठी एप्रिल २०१४ च्या लोकसभा निवडणूक कामाबाबतचा आदेश मिळाला.  केंद्राध्यक्ष व उपकेंद्राध्यक्षांची दोन प्रशिक्षण पनवेलच्या आगरी समाज हाल व के. व्ही . कन्या शाळेत झालीत .
     १७ एप्रिल २०१४ ला  निवडणूक असल्याने १६ तारखेला सकाळी ७ वाजता घरुन निघालो. तालुका बदलून ड्युटी करावी लागणार असल्याने मनाची तयारी झालीच होती. पनवेलच्या कळसेकर कालेजच्या प्रशस्त आवारात निवडणूक कामासाठीचे कर्मचारी जमले होते. प्रत्येकजण सही करुन नेमून दिलेल्या तालुक्याच्या गाडीत जावून बसत होता.  मी उरण बसमध्ये बसलो.  बहुतेक परिचित चेहरे आधीच बसमध्ये  येऊन बसले होते . बसमध्ये अनेक विषय चघळले गेले. तोपर्यंत उरण आले . उरणच्या फुंडे हायस्कूल मधून मतदान यंत्रे  घेऊन नेमून दिलेल्या बुथवर साधारणत: ३ वाजेपर्यंत  आम्ही पोहचलो. बुथ लावून घेतले व ५ वाजता परिसर बघायला बाहेर पडलो.  सोबत उपकेंद्राध्यक्ष श्री राठोड सर व शिपाई होता . रात्रीचे जेवण तलाठी कडून येईल असे सांगितले होते पण रात्री ९.४५ पर्यंत जेवण न आल्याने आम्ही जवळच्या हाटेलात जेवण केले व बुथवर थांबलेल्या महिला पोलिसाला जेवण पार्सल आणले . रात्री एम एस ई बी च्या व्ही आय पी रेस्ट हाऊसमध्ये दोन ए सी  खोल्या  घेऊन एकात महिला पोलिस व दुसर्यात आम्ही तिघं असे झोपलोत .
१७ तारखेला  पहाटे ५ वाजता आम्ही सर्व उठलो.  ६ ते ७ पर्यंत मोकपोल (अभिरुप मतदान)  घेतले .  ३ पक्षांचे तीन मतदार प्रतिनीधींचे समाधान झाल्यावर ६.५०ला  मतदान यंत्र सील केले व मतदारांची वाट पाहत बसलो.  बरोबर ७.०५ ला पहिले मतदार म्हणून एक आजोबा आले . तेथून थेट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्या बुथवर  ५२१ मतदानातून ३३१  म्हणजे ६३.५३ % मतदान झाले . या नंतर उपस्थित सर्व मतदार प्रतिनिधींना १७ सी चे वाटप करुन मतदान यंत्रे व्यवस्थित सीलबंद करुन बसची वाट पाहत थांबलो . ७.२५ ला बस आली . आमचं बुथ जवळच असल्याने अवघ्या ५ मिनीटात आम्ही सबमिशन सेंटरवर (फुंडे हायस्कूल)  पोहचलो.   टेबल नं. २ वर ५ ते ७ मिनीटात सर्व साहित्य जमा केले.  नि घरी पोहचलो.
     या निवडणूकीत उरण तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ बघायला मिळाला.  १६ एप्रिलचं दुपारचं जेवण फुंडे हायस्कूलच्या नव्या इमारतीत होतं पण आमच्या मतदान कर्मचार्यांची गर्दी बघून जेवणाचं कान्ट्रक्ट घेणारे पार गोंधळून गेले. कोणालाही पोटभर जेवता आले नाही.
मतदान साहित्य वाटपात व मतदान झाल्यावर पेट्या जमा करताना अनेकांना ताटकळत ठेवले गेले . महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी इतकेही सुस्त असतात त्याचा अनुभव आधीच्या निवडणूकांत जसा होता त्यापेक्षा या निवडणूकीत जास्तच जाणवले.  असो पुढील निवडणूकीत देव त्यांना सद्बुद्धि देवो.

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

एकेकाचे स्वभाव

'व्यक्ती तितक्या प्रव्रत्ती' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचे स्वाभिविक वेगळेपण नवा द्रष्टीकोन देणारे  असते,  वेगळ्या स्वाभाविक गुणविशेषांमुळे लक्षात राहिलेल्या दोन  व्यक्तींच्या आठवणी सांगतो. 
 १)   गावातल्या जि. प . च्या शाळेतले एक गुरुजी खूप तापट होते. ते  आम्हाला गणित शिकवायचे . साधी सरळ पध्दत सांगूनही मला काही गणित जमेना तेव्हा ते जाम भडकायचे , हातातल्या छडीने झोडपून काढायचे.  त्याच्या   माराच्या भीतीनेच मी व इतर विद्यार्थ्यांनी गणितात थोडीफार प्रगती साधली.   एकदा ते वर्गातल्या मुलांना घड्याळ शिकवत होते,  शाळेच्या मागच्या बाजूला झाडाखाली रेती टाकली होती तिथे आमचा वर्ग सुरु होता.  गुरुजी खुर्चीवर बसून दोन्ही पाय टेबलावर ठेवून डोक्यावरील टोपी डोळ्यांवर घेऊन झोप काढायचे, मग शिकवायचे . त्या दिवशी त्यांच्या हातातलं घड्याळ काढून ते काटे फिरवत व  एकेकाला जवळ बोलवून विचारायचेत :  त्यांनी मला बोलावले,  दोन तीनदा विचारल्यावरही मला धड सांगता न आल्याने त्यांनी टेबलावरच्या पायाने माझ्या छातीत बक्कदिशी  लाथ मारली,  मी रेतीत दूरवर घसरत गेलो तेव्हापासून पुढे मला घड्याळ नवीन शिकवायची गरजच पडली नाही.  'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' याचा प्रत्यय देतांना ' लातोंका भूत बातोंसे नही समजते ' याही म्हणीची ओळख करून दिली तीही अवघ्या ९ / १० वर्षाच्या वयातच . विद्यार्थ्यांबद्दलची पोटतिडीक व कर्तव्य दक्षता अशा दोन्ही बाबी त्यांच्या स्वभावात होत्या म्हणूनच ते संताप करायचेत  विद्यार्थ्यांबद्दलची काळजी निव्वळ गोड बोलून व्यक्त होतेच असं नाही. संतापातून साधनेकडे नेण्याचा त्यांचा ओढा होता.
   २) झिंगा  दाजी , एक साधा - सरळ माणूस.  सलग पाच सहा वर्षे त्यांच्या सोबत मी वावरलो.  सकाळी भल्या पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कामात मग्न असायचे.  मजूरीवर उदरनिर्वाह असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारण होती. त्यांना दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  मुलींची लग्ने होऊन त्याही सासरी गेल्या.  घरात एकटे दाजी उरले , तशाही परिस्थितीत कोणतही दु:ख न व्यक्त करता हा माणूस वयाच्या ७५ वर्षापर्यंत हसत खेळत वावरला.  "ठेविले अनंते तैसेचि राहावे,  चित्त असू द्यावे समाधानी " या संतवचनाचा प्रत्यय त्यांच्या जगण्यातून डोकवायचा.   अतिशय शांत , सोशिक , विनम्र,  प्रामाणिक,  कामसू व दिलदार मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती.   
वरील दोन्ही व्यक्तींच्या स्वभावात दोन विरोधी टोकं होती  पण दोघांच्या  स्वाभाविक वर्तनातून शिकायला मिळालं की माणसाकडे ऐहिक गोष्टी असोत वा नसोत पण त्याचा आत्मिक द्रष्टिकोन जसा असेल तशा पध्दतीने समाजात त्याची प्रतिमा ठरते . आतल्या आवाजाला प्रतिसाद देणारी ही माणसे असावीत म्हणूनच ते अजूनही मनाच्या गाभार्यात आहेत , इतर कित्येक जण मात्र दाट कळोखात गुडूप झाली आहेत . 
........................................................................................................................ 


 

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

चोर

आज पहाटे (१४ मार्च २०१४) १:३० वाजता काहीतरी ठोकल्याचा आवाज आला . मी मोबाईल  नेटवरुन पुस्तक डाऊनलोड करत असल्याने जागा होतो. आवाजामुळे माझ्या पत्नीलाही जाग आली. तिने हळूच बेडरुमची खिडकी उघडून कानोसा घेतला : आमच्या अल्टो गाडीच्या ड्रायव्हर विंडोची काच फोडली जात असल्याचे तिने पाहिले व मला बोलावले. मी  त्या  चोराला  सनसनीत शिवी हासडली  व तेथेच थांबायला सांगितले पण त्याने हातातला दगड फेकून पळ काढला . एव्हाना माझी  मुले जागी झाली होती. मी तात्काळ खान्देश्वर पोलीस स्टेशनला फोन केला व गाडीजवळ गेलो. गाडीची काच अर्धवट फोडलेली दिसली . तेवढ्यात पोलीस आले : त्यांनी चोराचे वर्णन विचारले व निघून गेले  . शेजारचे गुप्ता आले होते त्यांना घेऊन मी चोराला शोधायला बाईक घेऊन निघालो . सेक्टर ११ चे गार्डन , आतल्या गल्ल्या बघून आम्ही सेक्टर ९ पर्यत पोहचलो आणि स्वप्नील ने (माझा मोठा मुलगा ) मला फोन करुन कळविले की "पोलिसांनी चोराला पकडून आपल्या बिल्डींग जवळ आणले आहे , लवकर या !" मी व गुप्ता परत आलो . काच फोडणारा तो चोर अवध्या १५ ते २० मिनिटात पोलिसांनी डी .ए.व्ही. शाळेजवळून पकडला होता. चोराने गाडीची काच फोडल्याने मी  रागातच होतो. आल्याबरोबर त्या चोराच्या कानाखाली आवाज काढला  नि मग बोललो . चोराने पोलिसांना व मला तो शाव असल्याबाबत सांगायला सुरवात केली . पण त्याचं सगळं थोतांड पोलिसांनी ओळखलं आणि त्यांच्या बाईकवर बसवून चोराला पकडून नेलं .
  सकाळी ११ वाजता खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेलो . तिथे सूर्यवंशी नावाचे ड्युटी ऑफिसर भेटले , त्यांनी संद्याकाळी ६ नंतर येण्याबाबत सांगितले . पुन्हा मढवी सरांना घेऊन ६ वाजता पोलीस स्टेशनला गेलो . पण चोरासंबंधी माहिती असलेला अधिकारी रात्री ९ वाजता येतील , असे समजले परत यायला निघालो पण सूर्यवंशी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्याने ते थोड्या वेळात पोलीस स्टेशनला येतील म्हणून थांबलो . अर्ध्या तासात ते आले .सतीश पवार  साहेबांना भेटून चोरीच्या उद्देशाने माझ्या गाडीची काच फोडल्याबाबत ची तक्रार मी नोंदवली तेव्हा समजले कि त्या चोराने त्या रात्री दोन दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता , शिवाय त्याच्या कडे लोखंडी हत्यारे सापडली होती .
अवघ्या २० / २२ वर्षाच्या त्या तरुणाकडे ( चोराकडे ) बघून खूप वाईट वाटले . तो कोठेही काहीही कामधंदा करत नाही , पोटासाठी  उमेदीच्या वयात त्याला चोरी - मारी करावी लागते, तो व्यसनी असल्याचे व  घरातील व्यक्ती त्याला कंटाळली आसल्याचे पोलिसांनी सांगितले. आजचे बरेच तरुण वाट चुकत असल्याचे  ऐकून माहित होते , त्याची खात्री पटली. कोर्ट कचेरीची कटकट नको म्हणून पोलीसांनी  त्याच्यावरील गुन्हा रजिस्टर करू नका म्हणून मला सांगितले . शिवाय मढवी सरांना त्या चोराची दया आली ; सर म्हणाले, त्याला पोलीसांनी खूप मारले आहे, अजून त्याला त्रास द्यायला नको म्हणून मी त्याच्यावरील केस मागे घेण्याचा सल्ला सरांनी मला दिला. त्याला रात्रभर पोलीस मारतील म्हणून त्याला सोडायला सांगितले. त्याला सुधारायची संधी देऊ या असे आम्ही दोघांनी 
( मढवी सर व  मी ) ठरवले नि घरी आलोत.