रविवार, २ ऑगस्ट, २०२६

कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन येथे जाणीव सामाजिक संस्थेकडून भात लावणी पूर्ण !

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक : २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शांतीवन कुष्ठरोग निवारण समिती तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील अर्धा एकर शेतात भात लावणी करण्यात आली. 
शांतीवन संस्थेतील कुष्ठरोगातून पूर्णपणे मुक्त झालेले सदस्य श्री निळकंठ कोळी यांनी सर्व जाणीव सदस्यांना भात लावणी बाबत अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केले. शिवाय कुष्ठरोग अनुवंशिक नाही , कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार नाही , कुष्ठरोगावर मात केलेले हजारो रुग्ण समाजात सन्मानाने जीवन जगत आहेत इ . बाबत स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितलेत व जाणीव सामाजिक सेवा संस्था , रोटरी क्लब ऑफ सनराईज यांच्या सर्व सदस्यांबाबत अभिमान असल्याचे मत व्यक्त करून आभार मानले. 
जाणीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी जाणीव व्हॉट्स अप ग्रूपवर व्यक्त केलेल्या भावना खालील प्रमाणे : 
"आज खूप मज्जा आली. अर्धा एकराचे शेत २१ जणांनी भर पावसात श्रमदान करून, हास्य विनोद आणि धम्माल करून भात लावणी केली. शांतीवनच्या मंडळींनाही विश्वास नव्हता की आपण संपूर्ण शेत पूर्ण करू. 
अनुपस्थित सर्व जणीवन्स यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. 
आपण सर्वांनी यायला हवे होते. असो. 
शांतीवनचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर आणि खजिनदार सौ रेखाताई देखणे यांनी सर्व टीमला धन्यवाद दिले आहेत.
आपल्या भोजनाचे बिल त्यांनी घेतले नाही. 
आज पाऊसही छान होता आणि लावणी संपल्यावर ओढ्यातील पाण्याचा आस्वादही सर्वांनी छान घेतला.
एकंदरीत छान प्रोग्राम झाला. आजची एकूण उपस्थिती २१ होती. 
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद."
वार्तांकन : प्रा. संजय पाटील 
जाणीव व रोटरी सदस्यांना श्रमदानाचे महत्व कृतीतून सिद्ध करण्याची संधी देणारे : श्री विजय गोरेगावकर .

रविवार, ७ जून, २०२६

पर्यावरण दिनानिमित्त : सेवाभावी संस्थांचे संयुक्त श्रमदान !

पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक संस्थांचे एकत्रित श्रमदान
 
दिनांक ५ जून २०२६ या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन येथे जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि संत रोहिदास विकास मंडळ नवीन पनवेलच्या सदस्यांनी तसेच शांतीवनच्या पदाधिकाऱ्यांनी व कुटुंबीयांनी एकत्रित श्रमदान केले. 
       गेल्या दोन वर्षात सामाजिक संस्थांनी शांतीवन परिसरात लावलेल्या झाडांपैकी सुमारे १०० पेक्षा जास्त झाडांना सकाळी या सदस्यांनी पाणी घालून श्रमदानाची सुरूवात केली. 
        आंब्याचे बाठे तसेच इतर झाडांच्या बिया वापरून शांतीवन येथील नर्सरीत रोपे तयार करण्यासाठी  माती आणि खत घालून पिशव्या तयार करण्यात आल्या. 
त्यानंतर स्नेहलता निसर्गोपचार केंद्राच्या नवीन इमारतीच्या मागच्या बाजूस  २० झाडे लावण्यात आली. 
यावेळी शांतीवनचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर, कोषाध्यक्षा सौ रेखाताई देखणे, प्रमुख कार्यवाह अजय शिर्के , स्नेहलता निसर्गोपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कटारा तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि संत रोहिदास विकास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
----- वार्तांकन व  क्षणचित्रे संकलन --------
------ श्री. विजय गोरेगावकर ----



सोमवार, १६ मार्च, २०२६

जागतिक जलदिननिमित्त विद्यार्थ्यांसाठी जाणीव तर्फे अनोखे उपक्रम !

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल व रोटरी क्लब ऑफ सनराईज पनवेल या दोन सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचपाडा पनवेल येथील विद्यार्थ्यांसाठी जागतिक जल दिनाचे निमित्ताने अनोखे उपक्रम घेण्यात आलेत.  याबाबत सविस्तर वृतांत जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी खालील प्रमाणे दिलेला आहे.

जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले आजचे दोन उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या चिंचपाडा केंद्रशाळेत संपन्न झाले.
*उपक्रम १*
जलसाक्षरता अर्थात पाण्याचे योग्य नियोजन या विषयावरील चित्रकला स्पर्धेत ४२ मुलानी भाग घेतला. स्पर्धा सुरू होण्याआधी या विद्यार्थ्यांना विषय समजावून देण्यात आला. तसेच स्पर्धेचे परिक्षक म्हणून पनवेल नामवंत चित्रकार श्री उत्तम घोष हे उपस्थित होते. त्यांनीही मुलांना स्पर्धेआधी विशेष मार्गदर्शन केले. आजचे परिक्षक हे 
Sir J. J. Institute of Applied Art, Mumbai मधील Applied Art graduate असून ते 
Visual Artist आहेत. अनेक नामवंत कला प्रदर्शनात त्यांचा सहभाग आहे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कला उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. या क्षेत्रात त्यांनी खूप पारितोषिके प्राप्त केली आहेत. (जाणीवचे आजीव सदस्य श्री खेडेकर यांच्या कन्येच्या माध्यमातून हे परिक्षक आपल्यासाठी उपलब्ध झाले होते) 
*उपक्रम २*
खेळता खेळता पर्यावरण आणि पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने साप शिडीच्या धर्तीवर एक खेळ आपण तयार केला आहे. शाळेतील ३० मुले या खेळात सहभागी झाली. त्यांचे दोन गट करून हा खेळ घेण्यात आला. 
या खेळातून मुलांना पर्यावरण रक्षणाची आणि पाणी बचतीची सवय होईल, किमान ही मुले त्यावर विचार करतील आणि सक्षम नागरिक होण्याचा प्रयत्न करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. या खेळात दोन्ही गटांतील मुलानी अतिशय उत्साहाने भाग घेतला, खेळाच्या शेवटी  काय शिकता आले याबाबत चार विद्यार्थी यांनी आपापली प्रतिक्रियाही दिली. शाळेच्या शिक्षक वर्गासाठी हा आपला अनोखा उपक्रम आवडला. 
             दोन्ही उपक्रम झाल्यावर एका छोटेखानी बक्षिस समारंभात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमातील आठ उत्तेजनार्थ बक्षिसेही आजच्या कार्यक्रमात देण्यात आली. 
चित्रकला स्पर्धेचे परिक्षक श्री उत्तम घोष सर यांनी विद्यार्थ्यांना चित्र काढण्याच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. 
       जाणीव आणि रोटरी मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चिंचपाडा केंद्र शाळेत विविध उपक्रम आयोजित करीत असल्याबद्दल केंद्रप्रमुख ठाकूर सर, केंद्रशाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने धन्यवाद दिले आणि असेच विविध उपक्रमांचे आयोजन यापुढेही शाळेत करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. 
         उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आजचे दोन्ही उपक्रम संपन्न झाले.
(काही क्षणचित्रे फोटोंच्या स्वरूपात पाठवित आहे)

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

गरजू विद्यार्थ्यांची उणीव : भरून काढेल जाणीव !

गरजू विद्यार्थ्यांची उणीव : भरून काढेल जाणीव !
(पनवेल दिनांक : ३० ऑक्टोबर २०२५) 
जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेचे विश्वस्त श्री. खडताळे साहेब नवीन पनवेल यांच्या निवासाच्या सोसायटीत वापरात नसलेल्या दोन सायकल श्री. खडताळे यांच्या विनंतीनुसार सायकलींचे मालक श्री
 सायपुन शेख फॉरेस्ट ऑफिसर  यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेल्या परंतु वापरात नसलेल्या दोन सायकल जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या संस्थेच्या विश्वस्तांना दिनांक ३०/१०/२०२५ रोजी देणगी म्हणून दिल्यात.
जाणीव सामाजिक सेवा संस्थेने देणगी रूपाने मिळालेल्या दोन सायकल पैकी एक सायकल दुरुस्त करून नवीन पनवेल येथील कुमारी दिव्या पतंगे या कॉलेज तरुणीला भेट म्हणून दिलेली आहे. दुसरी सायकल दुरुस्ती झाल्यावर अन्य दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला जाणीव तर्फे भेट दिली जाणार आहे असे जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी सांगितले. शिवाय जाणीवची उणीव भरून काढणारे देणगीदार (दाते) श्री शेख आणि जाणीवचे विश्वस्त श्री खडताळे यांचे आभार मानलेत. पनवेल तालुक्यातील रहिवाशांना विनंती करण्यात येते की आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकल्स जाणीव सामाजिक सेवा संस्थेकडे देणगी द्या : जाणीव संस्थेतर्फे सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात दिल्या जातील असे आवाहन जाणीव संस्थेचे श्री महेश मुद्रस व अन्य विश्वस्तांनी उपस्थितांना केले आहे.  या छोटेखानी सायकल भेट प्रदान कार्यक्रमासाठी जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेलचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , विश्वस्त श्री आंबेकर साहेब , श्री खडताळे साहेब , श्री मुद्रस साहेब , श्री महाजन साहेब असे पाच विश्वस्त उपस्थित होते.
-------- वार्तांकन : प्रा. संजय पाटील --- 

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार !

 शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार ! 

शिक्षण हे वाघिणेचे दूध आहे ते पिणारा गुरगुरनारच ! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार प्रेरणादायी बनला आणि पाहता पाहता अनेक अशिक्षित , अल्पशिक्षित कुटुंबातील मुले मुली शिकून स्थिरस्थावर आयुष्य जगू लागली. शेती नि मातीत राबराब राबणाऱ्या कुटुंबातून कित्येक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व शिक्षणाने समृद्ध झालेत नि आज समाजात सन्मानाने जगताहेत. अशी शिक्षणाची महती  लक्षात घेऊन अनेकांनी आपली धुळपाटी फळ्यावर रेखाटण्यासाठी कंबर कसली.  
   सामान्य कुटुंबातील तरुणाने महागड्या शिक्षणाच्या धबडग्यात न अडकता समाजातील सोपा मार्ग निवडला नि  कित्येक जन शिक्षक शिक्षकेतर झालेत व होताहेत.  पण त्या शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला जे सोसावे /  किंवा भोगावे लागते आहे ते खूप भयानक / विदारक आहे. 
  आई - बापाने उसने पासणे जमवून उभे केलेले पैसे कमी पडू नयेत म्हणून कित्येकांनी वडिलोपार्जित जमिनी विकून शिक्षण क्षेत्रातील नोकरीसाठी वारेमाप पैसे खर्च केलेत / करताहेत .  नोकरीसाठी पैसे लागत नाहीत तर शिक्षण महत्वाचे म्हणण्याचे दिवस कधीच संपवले गेलेत.  संस्थेची मान्यता , बिंदू नामावली , विषयाची मान्यता , वर्कलोड मान्यता , शासनाची मान्यता ,  वैयक्तिक पदाला मान्यता ,  शालार्थ आयडी मान्यता अशा प्रत्येक पायरीवर लाखांचे नवस बोलून ते  फेडण्यासाठी पोतडीभर नारळ फोडावे लागत आहेत : तेव्हाकुठे प्रसाद म्हणून एक खोबऱ्याचा तुकडा हातावर येतो आहे. 
 शासनाचा पगार सुरू होईपर्यंत संस्था चालकांनी उदारपणे दिलेल्या  तुटपुंज्या उचल मधून घरभाडे , घरखर्च होऊन हातात कवडीही राहत नाही तरीही आशावादी बनून पाच ते पंधरा वर्ष आर्थिक ओढाताण सहन करून जे टिकून राहतील त्यांना सुखाचे दिवस येतील म्हणत कित्येक अभाग्यांच्या घरी आजही काळी दिवाळीच साजरी होतेय. कारण आहे शिक्षण क्षेत्रातील बोकाळलेला प्रचंड भ्रष्टाचार ! 
शिक्षक बनून पिढ्या घडवण्याचे फाटके स्वप्न कित्येकांनी बघितले : हातात पणती घेऊन काहींचे स्वप्न तेवत राहिलेत तर काहींचे विझलेत / काहींचे भंगलेत. याला कारणेही तशीच आहेत . 
  संस्था चालकांचे हुजरे ( चमचे ) आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या दलालांनी कित्येक मास्तरांच्या आणि मास्तरेतर लोकांच्या झोळ्या रिकाम्या करून आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. मास्तरांच्या झोपडीत अंधार आणि मुजोर संस्था चालक व मस्तवाल अधिकारी आणि त्यांच्या चमच्यांच्या घरी रोषणाई अशी आजची विदारक दिवाळी साजरी होतेय. त्यात काही हरामखोरी करणाऱ्या मुख्याध्यापकांनी कहरच केला आहे. काही नालायक मुख्याध्यापकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कित्येक शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या बापाचे नोकर समजून नको नको तितका त्रास देणे सुरू केले आहे . नोकरीला असलेल्या लोकांना कधी समायोजन करताना तर कधी  वरिष्ठ वेतनश्रेणी , निवडश्रेणी , पदोन्नती देताना या लांडग्यांनीं एकूण फरक बीलातील १० ते १५  % लचके तोडायचे धंदे सर्रास  सुरू ठेवले आहेत . संस्था चालकांचे आणि अधिकाऱ्यांचे आपणच दत्तक पुत्र समजणाऱ्या  ढोंगी मुख्याध्यापकांचा माज प्रचंड वाढला आहे. वाघाचे कातडे पांघरून ओझी वाहणारे गाढव अशी गत काही बिनलाज्या मुख्याध्यापकांची झालेली आहे ; असे मुख्याध्यापक जागोजागी उकिरडे हुंगताहेत म्हणूनच सामान्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा फराळ विटत चालला आहे .  लाचार / लाडघोटे  मुख्याध्यापक (चमचे) संख्येने वाढले आहेत. वाढत आहेत.  पावसाने झोडले नि राजाने छळले तर दाद कोणाकडे मागायची ? अशा विवंचनेत कित्येक शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढेही मोडत राहणार आहे.  
ही प्रतिकूल परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .
 कित्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले अर्धे आयुष्य बिन पगारी नि अल्पपगारी नोकरी ( चाकरी ) करून खर्ची घातले आहे.त्यात भरीस भर म्हणून शासनाच्या धोरणांनी शिक्षण आणि शिक्षकांचे पावित्र्य रसातळाला नेले आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होताहेत नि इंग्रजी माध्यमांसह सेल्फ फायनान्स शाळांचे पेव  फुटले आहे.  विना अनुदानित , सेल्फ फायनान्स , अनुदानित  २० % , ४०% , ६०%, ८०% , १००% पगारदार , जुनी पेन्शन वाले , नवीन पेन्शन वाले असे १२ गट करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचे १२ वाजवून  विटंबना अविरत सुरू ठेवली आहे. 
कधीकाळी सेवाधर्म हाच स्वधर्म असलेले  पवित्र मानले गेलेले शिक्षण क्षेत्र आज भ्रष्टाचाराने बरबटलेला बाजार बनून कानठळ्या बसवणाऱ्या हाळ्या देत आहे. बैल बाजारात बैलांचा / गुरांचा लिलाव होतो तसा लिलाव शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षणाचा सुरू आहे .याला वेळीच पायबंद घातला गेला तरच शिक्षणाचे मांगल्य जपले जाईल अन्यथा  शिक्षण , शिक्षक आणि शिक्षकेतर हंबरडा फोडतील आणि म्हणतील : अरे हरामखोरांनो , जनाची नाही किमान मनाची लाज बाळगा ! भीक नको कुत्रे आवरा ! माणसाला माणूस बनून जगू द्या !  बेबंदशाही मोगलाई सरु द्या ; इडा -  पिडा टळू द्या ; शिवरायांचे सुराज्य पुन्हा अवतरू द्या ! 
------- प्रा. संजय माधवराव पाटील. ------  (दिवाळी २०२५)







 

अंधारलेल्या झोपडीत जाणीवची पणती !

दिवाळीनिमित्त रिटघर आदिवासी वाडीवर  जाणीव आणि रोटरीचा एक घास वंचितांसाठी 
पनवेल : गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाही जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे १९ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त रिटघर आदिवासीवाडी येथील आदिवासी मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
           जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सचिव रुपेश यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर या उपक्रमाचे प्रकल्प संचालक महेश मुद्रस यांनी या उपक्रमामागील उद्देश सर्वांना सांगितला . दिवाळीचा आनंद या चिमुकल्या मुलांसोबत साजरा करताना सदस्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. या वाडीवरील शाळाबाह्य मुलांसाठी रोज दोन तास शिकवण्याचे काम सेवाभावी वृत्तीने करणाऱ्या मनोहर ढोके आणि त्यांची कन्या अर्चना यांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असल्याचे आवर्जून सांगून त्यांनी श्री ढोके यांना धन्यवाद दिले. रोटरीच्या वतीने रो. बाळकृष्ण आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
        दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी या वाडीवरील २५ ते ३० मुले आणि त्यांचे पालक यांचेसह एकत्रित दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि दिवाळीचा एक वेगळा आनंद अनुभवला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदस्यांनी या चिमुकल्या मुलांसाठी व पालकांसाठी आणलेले कपडे, खेळणी, चप्पल्स, शूज इ. नित्योपयोगी वस्तू या मुलांना दिल्या. 

    यावेळी या वाडीवरील एका पालकांनी आपल्या मनोगतातून श्री ढोके सरांच्या सामाजिक कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
            या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरीचे २२ सदस्य आपल्या परिवारातील सदस्यांसह उपस्थित होते. या कार्यक्रमातून एक वेगळे समाधान मिळाल्याचे तसेच अशा उपक्रमातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो असे सहभागी सदस्यांनी सांगितले.
           यावेळी श्री ढोके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येथील मुलांची पार्श्वभूमी सांगून गेली तीन वर्षे जाणीव आणि रोटरी मार्फत होत असलेल्या अशा उपक्रमाबाबत  तसेच इतर वेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले.
----- वृत्तांकन : श्री. रुपेश यादव ----

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

        आजचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन  हा कार्यक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.
      वडघर केंद्र शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी , केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, जाणीवचे सदस्य आणि रोटरीचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
        सर्वप्रथम शाळेच्या वतीने जाणीव आणि रोटरीच्या उपस्थित सर्वांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जाणीवचे निमंत्रित विश्वस्त बाळकृष्ण आंबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाबाबत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाची माहिती जाणीव चे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी सांगितली. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध विषयांवरील ३५ पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अग्निपंख या दिवंगत भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या अग्निपंख या पुस्तकातील काही परिच्छेदांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केले.
      जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने रो.डॉ विजयकुमार कुलकर्णी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात स्वच्छ कसे आणि का धुवावेत याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्यासाठी शाळेला हॅण्ड वॉश लिक्वीड देण्यात आले. 
      त्यानंतर दंत/मौखिक आरोग्याविषयी डॉ ऋतुपर्ण ससाणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 
       आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेच्या प्राचार्या म्हात्रे मॅडम तसेच केंद्र प्रमुख ठाकूर सर यांनी दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. 
         शेवटी जाणीवचे सचिव आणि या दोन्ही उपक्रमाचे प्रकल्प संचालक रुपेश यादव यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला. 
         आजच्या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---- वार्तांकन : श्री. विजय गोरेगावकर ---