गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

गरजू विद्यार्थ्यांची उणीव : भरून काढेल जाणीव !

गरजू विद्यार्थ्यांची उणीव : भरून काढेल जाणीव !
(पनवेल दिनांक : ३० ऑक्टोबर २०२५) 
जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेचे विश्वस्त श्री. खडताळे साहेब नवीन पनवेल यांच्या निवासाच्या सोसायटीत वापरात नसलेल्या दोन सायकल श्री. खडताळे यांच्या विनंतीनुसार सायकलींचे मालक श्री
 सायपुन शेख फॉरेस्ट ऑफिसर  यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेल्या परंतु वापरात नसलेल्या दोन सायकल जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या संस्थेच्या विश्वस्तांना दिनांक ३०/१०/२०२५ रोजी देणगी म्हणून दिल्यात.
जाणीव सामाजिक सेवा संस्थेने देणगी रूपाने मिळालेल्या दोन सायकल पैकी एक सायकल दुरुस्त करून नवीन पनवेल येथील कुमारी दिव्या पतंगे या कॉलेज तरुणीला भेट म्हणून दिलेली आहे. दुसरी सायकल दुरुस्ती झाल्यावर अन्य दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला जाणीव तर्फे भेट दिली जाणार आहे असे जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी सांगितले. शिवाय जाणीवची उणीव भरून काढणारे देणगीदार (दाते) श्री शेख आणि जाणीवचे विश्वस्त श्री खडताळे यांचे आभार मानलेत. पनवेल तालुक्यातील रहिवाशांना विनंती करण्यात येते की आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकल्स जाणीव सामाजिक सेवा संस्थेकडे देणगी द्या : जाणीव संस्थेतर्फे सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात दिल्या जातील असे आवाहन जाणीव संस्थेचे श्री महेश मुद्रस व अन्य विश्वस्तांनी उपस्थितांना केले आहे.  या छोटेखानी सायकल भेट प्रदान कार्यक्रमासाठी जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेलचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , विश्वस्त श्री आंबेकर साहेब , श्री खडताळे साहेब , श्री मुद्रस साहेब , श्री महाजन साहेब असे पाच विश्वस्त उपस्थित होते.
-------- वार्तांकन : प्रा. संजय पाटील --- 

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार !

 शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार ! 

शिक्षण हे वाघिणेचे दूध आहे ते पिणारा गुरगुरनारच ! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार प्रेरणादायी बनला आणि पाहता पाहता अनेक अशिक्षित , अल्पशिक्षित कुटुंबातील मुले मुली शिकून स्थिरस्थावर आयुष्य जगू लागली. शेती नि मातीत राबराब राबणाऱ्या कुटुंबातून कित्येक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व शिक्षणाने समृद्ध झालेत नि आज समाजात सन्मानाने जगताहेत. अशी शिक्षणाची महती  लक्षात घेऊन अनेकांनी आपली धुळपाटी फळ्यावर रेखाटण्यासाठी कंबर कसली.  
   सामान्य कुटुंबातील तरुणाने महागड्या शिक्षणाच्या धबडग्यात न अडकता समाजातील सोपा मार्ग निवडला नि  कित्येक जन शिक्षक शिक्षकेतर झालेत व होताहेत.  पण त्या शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला जे सोसावे /  किंवा भोगावे लागते आहे ते खूप भयानक / विदारक आहे. 
  आई - बापाने उसने पासणे जमवून उभे केलेले पैसे कमी पडू नयेत म्हणून कित्येकांनी वडिलोपार्जित जमिनी विकून शिक्षण क्षेत्रातील नोकरीसाठी वारेमाप पैसे खर्च केलेत / करताहेत .  नोकरीसाठी पैसे लागत नाहीत तर शिक्षण महत्वाचे म्हणण्याचे दिवस कधीच संपवले गेलेत.  संस्थेची मान्यता , बिंदू नामावली , विषयाची मान्यता , वर्कलोड मान्यता , शासनाची मान्यता ,  वैयक्तिक पदाला मान्यता ,  शालार्थ आयडी मान्यता अशा प्रत्येक पायरीवर लाखांचे नवस बोलून ते  फेडण्यासाठी पोतडीभर नारळ फोडावे लागत आहेत : तेव्हाकुठे प्रसाद म्हणून एक खोबऱ्याचा तुकडा हातावर येतो आहे. 
 शासनाचा पगार सुरू होईपर्यंत संस्था चालकांनी उदारपणे दिलेल्या  तुटपुंज्या उचल मधून घरभाडे , घरखर्च होऊन हातात कवडीही राहत नाही तरीही आशावादी बनून पाच ते पंधरा वर्ष आर्थिक ओढाताण सहन करून जे टिकून राहतील त्यांना सुखाचे दिवस येतील म्हणत कित्येक अभाग्यांच्या घरी आजही काळी दिवाळीच साजरी होतेय. कारण आहे शिक्षण क्षेत्रातील बोकाळलेला प्रचंड भ्रष्टाचार ! 
शिक्षक बनून पिढ्या घडवण्याचे फाटके स्वप्न कित्येकांनी बघितले : हातात पणती घेऊन काहींचे स्वप्न तेवत राहिलेत तर काहींचे विझलेत / काहींचे भंगलेत. याला कारणेही तशीच आहेत . 
  संस्था चालकांचे हुजरे ( चमचे ) आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या दलालांनी कित्येक मास्तरांच्या आणि मास्तरेतर लोकांच्या झोळ्या रिकाम्या करून आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. मास्तरांच्या झोपडीत अंधार आणि मुजोर संस्था चालक व मस्तवाल अधिकारी आणि त्यांच्या चमच्यांच्या घरी रोषणाई अशी आजची विदारक दिवाळी साजरी होतेय. त्यात काही हरामखोरी करणाऱ्या मुख्याध्यापकांनी कहरच केला आहे. काही नालायक मुख्याध्यापकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कित्येक शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या बापाचे नोकर समजून नको नको तितका त्रास देणे सुरू केले आहे . नोकरीला असलेल्या लोकांना कधी समायोजन करताना तर कधी  वरिष्ठ वेतनश्रेणी , निवडश्रेणी , पदोन्नती देताना या लांडग्यांनीं एकूण फरक बीलातील १० ते १५  % लचके तोडायचे धंदे सर्रास  सुरू ठेवले आहेत . संस्था चालकांचे आणि अधिकाऱ्यांचे आपणच दत्तक पुत्र समजणाऱ्या  ढोंगी मुख्याध्यापकांचा माज प्रचंड वाढला आहे. वाघाचे कातडे पांघरून ओझी वाहणारे गाढव अशी गत काही बिनलाज्या मुख्याध्यापकांची झालेली आहे ; असे मुख्याध्यापक जागोजागी उकिरडे हुंगताहेत म्हणूनच सामान्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा फराळ विटत चालला आहे .  लाचार / लाडघोटे  मुख्याध्यापक (चमचे) संख्येने वाढले आहेत. वाढत आहेत.  पावसाने झोडले नि राजाने छळले तर दाद कोणाकडे मागायची ? अशा विवंचनेत कित्येक शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढेही मोडत राहणार आहे.  
ही प्रतिकूल परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .
 कित्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले अर्धे आयुष्य बिन पगारी नि अल्पपगारी नोकरी ( चाकरी ) करून खर्ची घातले आहे.त्यात भरीस भर म्हणून शासनाच्या धोरणांनी शिक्षण आणि शिक्षकांचे पावित्र्य रसातळाला नेले आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होताहेत नि इंग्रजी माध्यमांसह सेल्फ फायनान्स शाळांचे पेव  फुटले आहे.  विना अनुदानित , सेल्फ फायनान्स , अनुदानित  २० % , ४०% , ६०%, ८०% , १००% पगारदार , जुनी पेन्शन वाले , नवीन पेन्शन वाले असे १२ गट करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचे १२ वाजवून  विटंबना अविरत सुरू ठेवली आहे. 
कधीकाळी सेवाधर्म हाच स्वधर्म असलेले  पवित्र मानले गेलेले शिक्षण क्षेत्र आज भ्रष्टाचाराने बरबटलेला बाजार बनून कानठळ्या बसवणाऱ्या हाळ्या देत आहे. बैल बाजारात बैलांचा / गुरांचा लिलाव होतो तसा लिलाव शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षणाचा सुरू आहे .याला वेळीच पायबंद घातला गेला तरच शिक्षणाचे मांगल्य जपले जाईल अन्यथा  शिक्षण , शिक्षक आणि शिक्षकेतर हंबरडा फोडतील आणि म्हणतील : अरे हरामखोरांनो , जनाची नाही किमान मनाची लाज बाळगा ! भीक नको कुत्रे आवरा ! माणसाला माणूस बनून जगू द्या !  बेबंदशाही मोगलाई सरु द्या ; इडा -  पिडा टळू द्या ; शिवरायांचे सुराज्य पुन्हा अवतरू द्या ! 
------- प्रा. संजय माधवराव पाटील. ------  (दिवाळी २०२५)







 

अंधारलेल्या झोपडीत जाणीवची पणती !

दिवाळीनिमित्त रिटघर आदिवासी वाडीवर  जाणीव आणि रोटरीचा एक घास वंचितांसाठी 
पनवेल : गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाही जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे १९ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त रिटघर आदिवासीवाडी येथील आदिवासी मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
           जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सचिव रुपेश यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर या उपक्रमाचे प्रकल्प संचालक महेश मुद्रस यांनी या उपक्रमामागील उद्देश सर्वांना सांगितला . दिवाळीचा आनंद या चिमुकल्या मुलांसोबत साजरा करताना सदस्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. या वाडीवरील शाळाबाह्य मुलांसाठी रोज दोन तास शिकवण्याचे काम सेवाभावी वृत्तीने करणाऱ्या मनोहर ढोके आणि त्यांची कन्या अर्चना यांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असल्याचे आवर्जून सांगून त्यांनी श्री ढोके यांना धन्यवाद दिले. रोटरीच्या वतीने रो. बाळकृष्ण आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
        दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी या वाडीवरील २५ ते ३० मुले आणि त्यांचे पालक यांचेसह एकत्रित दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि दिवाळीचा एक वेगळा आनंद अनुभवला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदस्यांनी या चिमुकल्या मुलांसाठी व पालकांसाठी आणलेले कपडे, खेळणी, चप्पल्स, शूज इ. नित्योपयोगी वस्तू या मुलांना दिल्या. 

    यावेळी या वाडीवरील एका पालकांनी आपल्या मनोगतातून श्री ढोके सरांच्या सामाजिक कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
            या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरीचे २२ सदस्य आपल्या परिवारातील सदस्यांसह उपस्थित होते. या कार्यक्रमातून एक वेगळे समाधान मिळाल्याचे तसेच अशा उपक्रमातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो असे सहभागी सदस्यांनी सांगितले.
           यावेळी श्री ढोके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येथील मुलांची पार्श्वभूमी सांगून गेली तीन वर्षे जाणीव आणि रोटरी मार्फत होत असलेल्या अशा उपक्रमाबाबत  तसेच इतर वेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले.
----- वृत्तांकन : श्री. रुपेश यादव ----

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

        आजचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन  हा कार्यक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.
      वडघर केंद्र शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी , केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, जाणीवचे सदस्य आणि रोटरीचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
        सर्वप्रथम शाळेच्या वतीने जाणीव आणि रोटरीच्या उपस्थित सर्वांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जाणीवचे निमंत्रित विश्वस्त बाळकृष्ण आंबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाबाबत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाची माहिती जाणीव चे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी सांगितली. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध विषयांवरील ३५ पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अग्निपंख या दिवंगत भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या अग्निपंख या पुस्तकातील काही परिच्छेदांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केले.
      जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने रो.डॉ विजयकुमार कुलकर्णी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात स्वच्छ कसे आणि का धुवावेत याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्यासाठी शाळेला हॅण्ड वॉश लिक्वीड देण्यात आले. 
      त्यानंतर दंत/मौखिक आरोग्याविषयी डॉ ऋतुपर्ण ससाणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 
       आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेच्या प्राचार्या म्हात्रे मॅडम तसेच केंद्र प्रमुख ठाकूर सर यांनी दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. 
         शेवटी जाणीवचे सचिव आणि या दोन्ही उपक्रमाचे प्रकल्प संचालक रुपेश यादव यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला. 
         आजच्या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---- वार्तांकन : श्री. विजय गोरेगावकर ---

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

शांतीवनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर संध्या कार्यक्रमाचे आयोजन*

*शांतीवनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर संध्या कार्यक्रमाचे आयोजन*
      
 जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेलच्या वतीने कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीचे औचित्य साधून २८ सप्टेंबर रोजी मराठी हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सूरसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.
      या कार्यक्रमात जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तसेच इतर सहयोगी गायकांनी तबला आणि हार्मोनियमच्या साथीने मराठी हिंदी गीते सादर केली.  दोन तासाच्या या कार्यक्रमात शेवटच्या अर्ध्या तासात कराओके वर हिंदी गीतेही सादर करण्यात आली. 
        या कार्यक्रमास वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी समरस होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला.  या कार्यक्रमास कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर हे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जाणीव ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी जाणीव परिवाराचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या वेळी जाणीवचे सदस्य आपल्या परिवार आणि मित्र मंडळीसह उपस्थित होते. 
        या कार्यक्रमासाठी तबल्यावर साथ विनायक प्रधान सर यांनी तर हार्मोनियमवर साथ सौ पद्मजा जोशी मॅडम यांनी देऊन जाणीव संस्थेस सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जाणीवच्या प्रकल्प संचालिका प्रतिमा जाधव यांनी केले होते. 
     या कार्यक्रमाचे अतिशय सुन्दर पद्धतीने आणि आपल्या खास शैलीत प्रा. प्रद्न्या जाधव लातूरकर यांनी केले. 
       जाणीवला सामाजिक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या मधुरा तायडे यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला तसेच विनायक प्रधान सर, सौ पद्मजा जोशी मॅडम आणि ॲड प्रमोद ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जाणीव परिवारातील राजेंद्र जाधव, रुपेश यादव, सौ अरुणा खडताळे, सौ वनिता गोरेगावकर, प्रतिमा जाधव 
इतर सहयोगी गायिका 
ॲड सुजाता टेकळे, कु आद्या टेकळे
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाणीवचे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी केले तर सचिव रुपेश यादव यांनी आभार व्यक्त केले. 
       ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून फळे आणि खाऊ भेट देऊन हा सूरसंध्या कार्यक्रम संपन्न झाला.
- वार्तांकन : श्री. विजय गोरेगावकर --
पनवेल नगरी ब्लॉग पेजवर श्री राजू गाडे यांनी वरील बातमीला प्रसिद्धी दिलेली आहे 
 

रविवार, २९ जून, २०२५

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेचा तिसरा वर्धापन दिन शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता युसुफ मेहरअली सेंटर , तारा येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जाणीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , सचिव श्री रुपेश यादव , खजिनदार श्री बोपटे , जाणीव संस्थेचे सर्व ११ विश्वस्त , त्यांचे परिवारातील सदस्य असे एकूण ३६ सदस्य या समारंभासाठी शनिवारी दुपारी ३ वाजता तारा येथे आपल्या खाजगी वाहनाने पोहचले. सायंकाळी ५ वाजता सर्व उपस्थित सदस्यांची आपापसात ओळख परिचय झाल्यावर सर्वांना सेंटर वरील कॅन्टीन मध्ये चहा नाष्टा देण्यात आला. 
शनिवारी सायंकाळी ६ वाजता जाणीव संस्थेच्या वर्धापन दिन सोहळा जाणिवेचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. जाणिवेचे सचिव श्री रुपेश यादव यांनी सभेला सुरुवात करताना गेल्या वर्षी विविध अप्रिय घटनांमध्ये मृत्युमुखी झालेल्या , शहीद झालेल्या देशातील विविध क्षेत्रातील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली.
जाणीव संस्थेच्या गेल्या वर्षीच्या शांतीवन पनवेल येथे झालेल्या वार्षिक सभेचा इतिवृत्तांत श्री रुपेश यादव यांनी वाचून त्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून एकूण १७ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आलेत. त्या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे एकूण ६५ हजार रुपये खर्च झालेत.गेल्या वर्षभरात संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या एकूण चार सभा घेण्यात आल्यात. संस्थेचा गेल्या वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल यावेळी मंजूर करून सर्व सभासदांना देण्यात आला.त्यानंतर संस्थेचा गेल्या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालाचे वाचन संस्थेचे खजिनदार श्री. बोपटे यांनी वाचून त्या अहवालाला मंजुरी देण्यात आली. संस्थेचे गेल्या वर्षी लेखा परीक्षांचे कामकाज पाहणारे लेखा परीक्षक यांनाच आर्थिक वर्ष २५_२६ चे लेखा परीक्षांचे कामकाज पाहण्यास मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या आर्थिक वर्ष २५_२६ च्या अंदाजपत्रकात विविध उपक्रमांसाठी एकूण ७० हजार रुपये खर्चासाठी मंजुरी देताना संस्थेचे आठ उद्दिष्टे आहेत म्हणून आर्थिक वर्ष २५_२६ मध्ये प्रत्येक उद्दिष्टांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ८० हजार रुपये अंदाज पत्रकता घेण्यात यावेत अशी सूचना करण्यात आली व त्यास मंजुरी देण्यात आली.
जाणीव संस्थेच्या मुदत ठेवीची मुदत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. 
आयत्या वेळच्या विषयात संस्थेच्या रितीरिवाजाप्रमाणे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून योगिनी वैदू यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल सन्मानचिन्ह बहाल करून गौरवण्यात आले तर संस्थेचा दोन आजीव सदस्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यात श्री संजय पाटील यांना सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे  उपप्राचार्य पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल तर सौ. रंगारी मॅडम  यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात  एक्झिक्युटिव्ह  इंजिनियर पदावर बढती मिळाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.  

रविवार, २७ एप्रिल, २०२५

पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा

माजी शिक्षण सहसंचालक श्री रोहिदास पोटे यांचे भाषण येथे क्लिक करून ऐका.

*पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धासंपन्न*

ज्ञानसाधना वाचनालय व ग्रंथालय , आनंद ज्येष्ठ नागरिक संघ  नवीन पनवेल व जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने (२३ एप्रिल) पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा घेण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की , जागतिक पुस्तक दिनाचे महत्व लक्षात घेऊन दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र , सेक्टर १४  (सी. के.टी गार्डन) नवीन पनवेल येथे उपरोक्त स्पर्धा आयोजित केलेली होती परंतु पहलगाम येथील भ्याड आतंकवादी हल्यात नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्याच दिवशी त्यांचे पार्थिव नवीन पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी येणार असल्याने दिलीप देसलें यांना श्रद्धांजली अर्पण करून उपरोक्त नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. 
दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा हा रद्द झालेला उपक्रम वरील तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. या स्पर्धेसाठी माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे साहेब , प्रा. संजय पाटील सर , कुडके  सर हे परीक्षक म्हणून तर ज्ञानसाधना वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णकांत अंबोलकर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन पवार आणि जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगावकर आणि मंडळाचे सचिव पूगावकर सर तसेच वाचनालयाचे उपाध्यक्ष रोहिदास पोटे सर, विश्वस्त गोपीनाथ तुळसणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपरोक्त स्पर्धेचे  विद्यार्थी वाचक  गट आणि खुला वाचक गट असे दोन गट करण्यात आले होते . या दोन्ही गटात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुशल कथन शैलीने त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपली मनोगते अतिशय प्रभावीपणे सादर केलीत. दोन्ही गटातून प्रथम द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी प्रदान करण्यात आलीत. प्रथम द्वितीय आलेल्या स्पर्धकांना स्मृतीचिन्हे आणि पुस्तक तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना पुस्तके पारितोषिक म्हणून भेट देण्यात आलेत. 
दोन्ही गटातील स्पर्धकांचे निकाल खालील प्रमाणे काढण्यात आलेत.
*विद्यार्थी गट*
प्रथम - फातिमा शेख 
द्वितीय - सारा शिर्के 
उत्तेजनार्थ - देवेश दळवी 
*खुला गट*
प्रथम -प्रज्ञा जाधव 
द्वितीय - सारिका दिवेकर 
उत्तेजनार्थ - सानिका कुलकर्णी 

संत रोहिदास विकास मंडळाचे सचिव सुरेश पुगावकर सर  यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आणि आभार प्रकटीकरण  केले. तिन्ही संस्थांचे पदाधिकारी , सदस्य ,स्पर्धेचे परीक्षक , स्पर्धक आणि उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------वार्तांकन : प्रा. संजय पाटील.------

(जाणीव संस्थेचे संस्थापक श्री. विजय गोरेगावकर यांचेकडून प्राप्त झालेले फोटो येथे प्रदर्शित केले आहेत.)