मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

जागर

मराठवाडा  परिसरातील धनगर त्यांच्या मेंढ्यांचा काफिला घेऊन आमच्या गावाच्या पंचक्रोशीत येत  असत.  मेंढ्यांच्या कळपाला वाडा म्हणायचे. वाडा जेवढा मोठा तेवढी त्याची किंमत ठरायची.   एका रात्रीत एकरभर शेत मेंढीच्या लेंडीने सारवलं  जाईल अशा वाड्याच्या मालकाला मान असायचा.        
    अशाच एका मोठ्या वाड्याचा मुक्काम एकावर्षी आमच्या  मळ्यात होता. तब्बल १० रात्री चा मुक्काम असल्याने वाड्यातली बायका- पोरं नि गडी-माणसं चांगलीच परिचयाची झाली होती. रोज संध्याकाळी मेंढ्या शेतात बसवल्यावर तरुण  मेंढपाळ मुलं - मुली पाणी भरायला  विहिरीवर यायचे; तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या चालीरीती,पूजाविधी व सणसमारंभाची माहिती मिळायची. या समाजातील मुला - मुलींची लग्न खूप कमी वयात होतात याबद्दल विचारले असता त्यातल्या पोक्त माणसाने सांगितले की , " आमच्या पोरापोरींना मेंढी  आणि  लेंडीची    पारख  करता येईस्तोवर  आम्ही थांबतो , आमची पोरं शिकत्यात सवरतात काय ?  रोजच्या जगण्यातूनच शहाणपण येतं मग लगीन करायला काय हरकत नसते कोणाची"  जीवन जगायला ज्या प्राथमिक बाबी लागतात तेवढ्या  असल्या की जगणं सोपं होतं. असा सरळधोप अर्थ त्याच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचा. 
  त्या वाड्यावरील  १३ वर्षाच्या  सुभीचं लग्न जवळपास  तिच्याच वयाच्या मुलाबरोबर ठरलं होतं. त्या लग्नाच्या हळदीचं निमंत्रण काशा    धनगराने मोठ्या   आपुलकीनं   दिलं  . मेढ्यांचं मटण - भाकरी चं जेवण होतं .  जेवणा नंतर खंडोबाचा जागर होता. वाघ्या मुरळींची जेवणं झाल्यावर खंजीरी- संबळचा नाद जंगलभर घुमायला लागला. रात्र जशी वाढत जाईल तसा जागर रंगात येऊ लागला.  तरण्या पोरं पोरींसोबत म्हतारी कोतारी मंडळी वाघ्या मुरळीच्या सोबत नाचू गाऊ लागली . भंडारा  उधळला  जायाचा  , खंडोबाची गाणी टीपेच्या सूरात  म्हटली  जात  होती . नाचणार्यांचं   अंग   घामाघुम  झालं   होतं  , अंगाला अंग घुसळवत भेभानपणे सगळे नाचत  होते.   शिवा धनगर  जोषात  नाचत  गात  होता ; नाचता  नाचता मुरळीच्या  अंगाशी लगट  करायचा. एका दोघांनी त्याला समज दिली  पण  त्याने त्याकडे   दुर्लक्ष केलं  .  तेवढ्यात   चिलीम ओढत बसलेल्या  गणाबाने शिवाला जवळ बोलावून फाडदिशी कानशिलात लगावली . शिवा काय समजायचा ते समजला . जागर संपेपर्यंत मुरळी पासून चार हात दूरच राह्यला. गणाबाच्या शब्दाला मान होता तर त्याच्या फटकावण्याला बहुमान असणारच!
  गणाबा या वाड्याचा मेढ्या (मालक ) होता.  वयाने  आणि अधिकाराने मोठा होता. त्याच्या भावकीतल्या आणि नात्यातल्या धनगरांच्या मेंढ्या एकत्र करुन त्याने वाडा बनवला होता . गेल्या १० वर्षापासून सर्वांना त्याचा भरभक्कम  आधार होता. गणाबा कडक शिस्तीचा व तत्वाचा असल्याने त्याचा दरारा मेंढपाळांबरोबर गावोगावच्या शेतकर्यांमध्येही दिसायचा. बाई आणि बाटली पासून अलिप्त असलेल्या गणाबाला शिवाचं वागणं खटकलं पण त्याने जागराचा रंगाचा बेरंग होऊ न देता शिवाला हाताळले. चांगुलपणा, धर्मभाव,नैतिकता इ. सद्गुण केवळ शिक्षणातून येत नाहीत तर गणाबासारखं  अंगी  बाणवायचे  असतात . निव्वळ सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारित असणं महत्वाचे आहे , हा विचार सुभीच्या हळदीला गणाबाने दिला. 

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

उमरठ

१५ वे कोकण मराठी साहित्य संमेलन दि. १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान महाड  येथे संपन्न झाले . ११ जानेवारी ला सांयकाळी ५ वाजता आम्ही तेथे पोहचलो. तेव्हा कवी संमेलन सुरु होते. प्रतिष्ठीत कवींच्या कविता  सादर होत होत्या . नाशिकच्या नामांकित काँलेजच्या प्राचार्या सौ . देशमुख मँडमने स्त्री भ्रुण हत्या या ज्वलंत विषयावर सादर केलेली कविता मनाला चटका लावून गेली. तर  'चोर'  या  विडंबन कवितेने  हसवत  हसवत वास्तवाचे  फटके दिले  , किशोर सोमन यांचे सूत्रसंचालन अप्रतिम होते. रात्री ९ ते १२ पर्यंत शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी गीतांचा सुंदर कार्यक्रम मराठीतील आघाडीचे सिनेकलाकार सुबोध भावे  व ....... यांनी सादर केला.
    १२ जानेवारीला निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होता परंतु  आम्हाला उमरठ या गावाला जायचे असल्याने अप्पांचे निरुपण आम्हाला ऐकता आले नाही. असो.
     उमरठला आम्ही मढवी सरांच्या मानलेल्या बहिणीला भेटायला गेलो होतो. सरांचे मोठे भाऊ : दादा ,नोकरीसाठी उमरठला असतांना ज्यांच्या घरात राहायचे ते घर आणि त्या घरातील व्यक्तींना मढवी  परिवार आजही विसरले नाहीत ; हे विशेष वाटलं. ज्या आजींना भेटण्यासाठी आम्ही उमरठ गेलो त्या आजी  वयोमानामुळे खूप थकल्या आहेत, आजीचा मुलगा आणि सून मुंबईला  असल्याने आजी एकट्याच राहतात. आम्ही गेलो तेव्हा आजी अंगण झाडत होत्या. पाठीला पोक आल्याने आजी वाकून चालतात तरीही आजींनी आम्हाला पाणी आणून दिलं. शिवाय जेवणासाठी आग्रह करु लागल्या .म्हातारपण ,एकाकीपण असूनही आजीची पाहुण्यांबद्दलची आस्था बघून मी भारावलो. मढवी परिवाराने जे नातं जपलय त्याचा पोत लक्षात आला. रक्ताचं नातं सहज विसरणार्या आजच्या काळात हे नातं खूप गहीरं आहे, असं जाणवलं . सख्या बहिणीला भावाबद्दल अंत:स्थ जिव्हाळा असावा तसं आजीचं मढवी  सरांशी बोलणं सुरु होतं . आजीच्या घरासमोरच विठ्ठल मंदीर आहे 'दर्शनाला जाऊन या' असं आजी बोलल्या नि आम्ही मंदिरात गेलो. मी कधीही कोणत्याही देवाकडून काहीच मागत नाही पण त्या दिवशी विठ्ठलाला मनोभावे एक प्रार्थना केली की आजीला  निरोगी , समाधानी व सुखी मरण येऊ दे!
    आजीचा निरोप घेऊन आम्ही तानाजी मालुसरे यांचं स्मारक बघायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामाणिक, समर्पित,शूर सेनापती  उमरठचे होते याचा सार्थ अभिमान उमरठकरांना असल्याचे जागोजागी दिसले. तानाजी मालुसरेंनी हाताळलेल्या तलवारी स्मारकाच्या समोरच राहणार्या कुटुंबाने आम्हाला दाखवल्या . 'गड आला पण सिंह गेला' असे भावोद्गार ज्यांच्याबद्दल निघाले  अशा   नरवीर  योद्ध्याचे  आणि  आयुष्यभर प्रेमळ , भावस्पर्शी नातं जपणार्या आजीचं गाव कसं विसरता येईल.

बुधवार, ८ जानेवारी, २०१४

नात्यांची दिवाळखोरी

१० वर्षांपूवी  दिवाळीच्या  सणाला आपुलकीचा , स्नेहाचा लख्ख प्रकाशदिवा  घराघरात दिसायचा , नात्यानात्यांतील माधुर्याचा फराळ ताटभर वाढला जायचा , वसुबारस पासून सुरू होणाऱ्या दिवाळसनाला गाई वासराच्या पूजनात पशुधनाबद्दलचे वात्सल्य डोळ्यात साठायचं .सडा सारवण झालेली घरे आणि आंगणे रंग - रांगोळीने  गोजिऱ्या लेकरसारखी निरपेक्ष हसायची ! धन त्रयोदशीला पंजोबांच्या काळापासून जपून ठेवलेली नाणी पाटावर विराजमान व्हायची , घरातील पोक्त माणसांपासून लहान लेकरांपर्यंत सगळेच धनाचे मांगल्यपूर्वक पूजन करायचे. दिवाळीसाठी आवर्जून खरेदी केलेली कापडं अंगभर नेसलीली दिसायची. पावित्र्य ,मांगल्य, शुचिर्भूतता यांचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या दिवसात आनंदाचं उधाण आलेलं दिसायचं ! कमालीची गरिबी असतानाही अल्पशा गोष्टीत आभाळभर समाधान हृदयात वसायचं !साधी भोळी माणसं देवासारखी होती म्हणूनच  सोज्वळ अगत्य दिसायचं  ! नात्यानात्यातील भावबंधन  निर्मळ, निरहंकारी  सुताने घट्ट  विणल जायचं ! थोडक्यात पूर्वीच्या सणात किंवा समारंभात प्रत्येक माणूस  माणुसपणाचं जगणं जगायचा ! नाती गोती मनपूर्वक जपायचा !
   काळ बदलत गेला आणि माणूस काळानुरूप बदलला . पद , पैसा , प्रतिष्ठा पणाला लागू नये म्हणून माणूस माणसापासून दुरावला गेला. खोटा गर्व , कमालीचा अहंकार आणि बेगडी भाव भावनांचं उथळ प्रदर्शन सुरू झालं! आर्थिक सुबत्ताच्या हव्यासापोटी लालच वाढतच गेली नि विश्वास हा शब्द पांगळा बनून गेला. पराकोटीचा द्वेष , जीवघेणी ईर्षा , सूड उगवण्याचं जहरी षडयंत्र यात नाती चिरडली गेली . माणूस हैवाण बनला . आजी - आजोबा , आई - वडील, पती - पत्नी , भावा - बहिनीतील रक्ताच्या नात्यांमधील ओलावा दिवसागणिक आटत गेला नि भावगर्भित असणारी  नाती रुक्ष बनली. कधी दोन  भाऊ  रक्ताचे नाते विसरुन एकमेकांच्या जीवावर उठतात तर कधी नवरा बायकोतील शुल्लक वाद घटस्फोट घडवतात. जिवाभावाची माणसं एकमेकांपासून एवढी दुरावतात की मरेपर्यंत एकत्र येत नाहीत. बहीण भावाचं स्नेहाचं नातं कोर्ट कचेरीत ओढलं गेलं नि काटेरी बनलं .एकत्र कुटुंब ही संकल्पना हद्दपारच झाली . वृद्धाश्रमात गेलेले आई बाबा दसरा - दिवाळीतही आठवत नाहीत इतकी निष्ठुरता वाढली. परदेशी गेलेल्या अपत्यांची आस मनात जागवत कित्येक थिजल्या डोळ्यांनी विरह वेदना सोसत मरण कवटाळलं ! 
   कधीकाळी आनंदाचं उधाण आणणारी दिवाळी , विशुद्ध नाते जपणारी दिवाळी, सुख- शांती - समाधान- स्नेहभाव प्रदान करणारी दिवाळी पुन्हा घराघरात नांदो आणि नाती सदृढ होवोत म्हणून  विधात्याने माणसांच्या कोत्या मनाचं , हलकट - हावरट स्वभावाचं, निष्ठुर निर्दयी पणाचं दिवाळ काढावं !

    

शांतीवनसाठी निधीसंकलन ( बातमी )

एन .एन. पालीवाला ज्यू. कॉलेज ,नवीन पनवेल या विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेत
( एन.एस.एस.) सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांनी कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे मोलाचे कार्य केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या संस्थेच्या एन.एन.पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल या विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबविले जातात.त्याचाच भाग म्हणून या वर्षी विद्यालयाचे प्राचार्य श्री . डी.व्ही. पवार सरांनी  कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे आवाहन विद्यालयातील एन.एस.एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री . संजय पाटील व श्रीमती हेमलता पुराणिक यांच्या मदतीने  विध्यार्थ्यांना  केले होते. त्यानुसार सर्व स्वयंसेवकांना निधी संकालासाठीचे छापील कार्ड वाटले होते. 
         स्वयंसेवकांनी या योजनेला उस्त्फुर्त पाठिबा दिला . गणपती सुट्टीत या सर्व स्वयंसेवकांनी समाजातील दानशूर व्यक्तींकडून तब्बल ११७०० रुपये इतका भरघोस निधी अवघ्या १५ दिवसात जमा करून प्राचार्यांच्या स्वाधीन केला.  
         सौ . काशीद के.व्ही.,व इतर सर्व वर्गशिक्षक व सहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेऊन या मोलाच्या सामाजिक कार्याला हातभार लावला म्हणून प्राचार्य पवार सरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. 
................................................................................................................................
लोकसत्ता  मध्ये हि बातमी प्रकाशित झाली आहे , बातमी वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256983
 


मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

श्रद्धा

सुधागड  एज्युकेशन  सोसायटी , पाली  तालुका सुधागड जिल्हा रायगड या मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष्य,रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष,दलित मित्र ,पर्यावरण मित्र,  आदर्श समाजसेवक, स्वातंत्र्य सेनानी,   गांधीवादी   विचाराचे   समर्थक अशा  विविध  सन्मानाने  सन्मानित  व्यक्तीमत्व  व  सुधागड शिक्षण परिवाराचे  पितामह  कै. केशव गोविंद लिमये
(दादासाहेब लिमये )  दिनांक २१/१०/२०१० रोजी अनंतात विलीन झाले . 
    दादासाहेब लिमयेंनी आपल्या १०१ वर्षाच्या दीर्घ आयुष्यात कित्येकांना रोजी रोटी तर दिलीच शिवाय कित्येक अभागी जीवांना मायेचा भरभक्कम हात दिला. कृती पाहिजे बडबड नको म्हणत आयुष्यभर कार्मवादाचा पुरस्कार करत   दादांनी निस्तेज मनांना उभारी  दिली.  दीन- दलितांबद्दल, उपेक्षितांबद्दल कणव आपल्या कृतीतून व्यक्त केली. विचाराने व आचाराने दरिद्री बनू नका म्हणत त्यांनी कित्येकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. म्हणूनच   पालीच्या बल्लाळेश्वरावर जशी भक्तांची असीम श्रद्धा आहे तशी  माझ्यासह अनेकांची  दादांबद्दल श्रद्धा आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

दुर्भाग्य

तीन वर्षापूर्वी  आमच्या  सोसायटीत एक पारशी  कुटुंब  भाडेकरू  म्हणून  राहायला  होते.  कुटुंब प्रमूख इस्पातमध्ये नोकरीला तर त्यांची पत्नी ग्रुहिणी.त्यांचा एकुलता एक मुलगा त्यावर्षी १० वीला होता .सूखी  ,आनंदी व  वैभव संपन्न असा   परिवार . पण  या  कुटुंबाची     एक  दुखरी किनार  होती. ते मूळचे पनवेलचेच असल्याने त्यांचे सर्व नातलग आसपास राहत असूनही कोणीही त्यांच्याकडे येत जात नव्हते.कौटुंबिक वाद असल्याने ते नाराज असल्याचं बाईच्या ( भाभी ) बोलण्यातून जाणवायचं. या भाभी स्वभावाने सालस , परोपकारी आणि चांगल्या सुगरण असूनही त्यांच्याशी नातलगलांचे का पटत नसावे हे कोडेच होते. असो.
     अशा या सुखी आणि गोड परिवारात एक  दिवस  अचानक  एक  मोठं  संकट उद्भवलं .कुटुंब प्रमुखाला लकवा झाला . त्यांचे हातपाय लुळे पडले , वाचा बोबडी झाली नि त्यांनी अंथरुण धरले. भाभीचं अवसान गळून गेलं , मुलाला काय करावे ते सूचेना . बरेच डाँक्टर झाले , सगळ्या प्रकारच्या   औषधी झाल्यात पण काही उपयोग होत नव्हता . भाभीला कोणीतरी सांगितले की कबुतराच्यां  ताज्या रक्ताने पेशंटच्या हातापायाला चोळले तर चांगला फायदा होईल .  भाभीने अनेकांकडे चौकशी करुनही  कबुतरं  काही  मिळेनात .  नवरा लवकर बरा व्हावा म्हणून भाभीची  आंतरिक धडपड आम्हाला दिसायची. 
एके   दिवशी भाभी आमच्याकडे आल्या नि कबुतर मिळत नसल्याबाबत दुःख व्यक्त केलं . आम्ही त्यांना धीर देत म्हटले - " काही काळजी करु नका , आम्ही प्रयत्न करतो ."  भाभीला दिलेल्या शब्दाखातर  शाळेतल्या शिपायाला सागून त्याच्या गावातील मुलाकडून एक कबुतर मिळवलं .  भाभीला खूप  बरं वाटलं , पेशंटचा  चेहरा उजळला , त्यांचा मुलगा समाधानी झाला.  मलाही बरं वाटलं. एका कबुतराच्या बलिदानाने त्या कुटुंबात आशेचा किरण उगवला होता.  यासारखे अनेक उपाय  जवळपास दोन वर्ष सुरु होते . यासाठी  त्यांचा खूप खर्च झाला   ; कर्ज झालं   , शिवाय नोकरी  सोडावी लागली .  पण भाभीने    हार मानली नाही . त्या सतत प्रयत्न करत राहिल्यात . मनापासून  तळमळ  असेल  ,  जिव्हाळा  असेल तर जिवघेणी संकटं परतवून लावता येतात हे भाभीच्या अथक प्रयत्नांनी सिध्द केलं . दहा  व्यवहारी नातेवाईकांपेक्षा एकच  भावनिक  साथीदार  हवा !
   भाभीचे यजमान आज चालू फिरु लागले आहेत . काही दिवसात ते पुन्हा नोकरी किंवा व्यवसाय करु शकतील आणि गतवैभव पुन्हा येईल अशी सदिच्छा आपण करु या .

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

आजीचे धाडस

माणसं  माणसांमध्ये माणसाप्रमाणे वागत नसल्याची अनेक उदाहरणं आपण दररोज अनुभवतो . काही दिवसांपूर्वी असाच एक अनुभव आला . डोंबिवली एस.टी.त नेहमीप्रमाणे गर्दी असल्याने मीही धावपळ करुन बस मध्ये चढायचा केविलवाना प्रयत्न करत होतो. तेवढ्यात एका आडदांड माणसाने हातातल्या बँगेने गर्दीतल्या लोकांना फटके देत चढाई करायला सुरवात केली. माझ्या सकट अनेकांना  त्याचे फटके खावे लागलेत . पण कोणीही त्या रानटी माणसाला विरोध करत नव्हते. त्याच गर्दीतल्या एका आजीने मात्र त्याच्या थोबाडीत ठेवून दिली आणि गर्दीतल्या लोकांनी आजीकडे 'अजि म्या ब्रम्ह पाहिले' असे पाहिले. ज्याला त्याच्या आडदांड पणाचा तोरा होता तो तर गपगारच झाला. मग आजीने त्याला जे ऐकवले ते ऐकून बसमधील सर्वांना नवल  वाटले . आजी त्याला म्हटली : " अरे , तू माणूस आहेस की हैवान , तुला माणूसपाणाची थोडीशीही चाड शिल्लक असेल तर माणसासारखा वाग ना ,  तुला काय वाटतं की तू खूप शौर्य गाजवतो आहेस का? , अरे ,भल्याभल्यांना त्यांचा गर्व सोडावा लागला , रावणाचा शेवट कसा झाला माहीत आहे ना .. माणूस बनून वागलास तर मान मिळेल नाहीतर शेण मिळेल "
  आजीचं बोलणं संपताच त्याने आजीचे पाय धरले .तो ओशाळून उभा राहिला . त्याच्या कृत्याची त्याला लाज वाटली . त्या दिवशीच्या आजीत मला  झाशीची राणी दिसलीच पण त्या सोबत मदर तेरेसाची कनवाळू भूमिकाही जाणवली. अशा आज्या आहेत म्हणून  समाजाचे  संतुलन राखून आहे ;अन्यथा माणसं आणि जनावरात फारसा फरक दिसणार नाही. त्या अनामिक आजीला हा मानाचा मुजरा!

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

एकांगी विचार

मी माझ्या सहकारी मित्रांसोबत काँलेजच्या मैदानातील उनाड पोरांना हटकत  होतो. ११ वी १२ वी ची मुलं थोडी बेफिकीर असतात म्हणून त्यांना वेळीच सावरावं लागतं: अन्यथा या वयातली मुलं  वाहवत जातात हा टिपीकल  मास्तरी  विचार करत आम्ही या पोरांना शिक्षणाचे फायदे सांगत सांगत वर्गात जाण्याबाबत आग्रह करत होतो. तेवढ्यात त्यातल्या एकाने मला प्रश्न केला  " तूम्ही शिकून काय कमवलं हो सर ? " मी एका  शब्दात त्याला म्हटलं : " समाधान !"  तो विक्षिप्त  हसला .  माझ्याकडे बारकाईने न्याहळत बोलला - " कुठे दिसत तर नाही ते , कसं असतं हे समाधान ..... " मी त्याला लांबलचक उपदेश करता करता म्हटलं - अरे , ते मानन्यावर असतं . तो अजूनही माझ्या जुनाट विचारांना मानायला तयार नब्हता ,   मास्तरांचं बोलणं पोचट असतं हा त्याचा दूषित ग्रह मला अस्वस्थ करून गेला .
   या वयातली बहुतेक मूलं असा विचार का करत असावीत ?  त्यांना नेमकं काय करावसं वाटतं ? शिक्षक खरोखर जुनाट व पोचट विचाराचे असतात का ? अशा  कितीतरी अनुत्तरीत प्रश्नांचा गुंता सोडवता सोडवता असे लक्षात येते की आजची मुलं जो विचार करतात त्या विचारांना आपण विकार समजतो, त्यांच्या सुख समाधानाच्या कल्पना आपल्या मते स्वैराचार ठरतात . मुलांच्या आचार -  विचारात जे बदल दिसतात  ते आपल्याला पटत नसले तरी त्यांना हवं असलेलं प्रेम,सहकार्य,सहानुभूती आणि संस्कार कमी झाल्यामुळेच ही मुलं असे एकांगी विचार करत असावेत असं मला वाटते.